नवी दिल्ली : कोरोनाचा फटका आता क्रिकेट विश्वालाही बसला आहे. एकीकडे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील एकदिवसीय सामना हा प्रेक्षकांविनाच खेळवण्यात आला होता. तर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेचे उर्वरित दोन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे सामने १५ मार्च आणि १८ मार्च रोजी अनुक्रमे लखनऊ आणि कोलकाता येथे खेळवले जाणार होते.
या मालिकेचे उर्वरित दोन सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळले जातील, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केले होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करावा लागला. त्यामुळे चाहत्यांना आगामी दोन सामन्यांबद्दल उत्सुकता होती.