काँग्रेसच्या वाटेने आम्ही गेलो असतो, तर देश बदलला नसता : पंतप्रधान नरेंद्र मोदी

06 Feb 2020 14:50:33
modi_1  H x W:







लोकसभेत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्र

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवदेन केले. पंतप्रधान भाषणासाठी उभे राहिल्यानंतर लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर काँग्रेस आणि इतर खासदारांनी महात्मा गांधी झिंदाबादच्या घोषणा दिल्या. काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांनी हा तर फक्त ट्रेलर आहे, असे मोदींना म्हटले. त्यावर हजरजबाबी मोदींनी तत्काळ, तुमच्यासाठी गांधीजी ट्रेलर असतील, आमच्यासाठी मात्र जीवन आहेत, असे उत्तर दिले.


पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘सभागृहातील प्रत्येक सदस्याने चांगली भूमिका मांडली आहे. यात काहीसा विरोधाचा सूरही लागला आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशातील जनतेने फक्त सरकार बदलले नाही, बदलही बघितला आहे. काँग्रेसच्या वाटेने आम्ही गेलो असतो, तर देश बदलला नसता. ३७० कलम, तिहेरी तलाक रद्द झाले नसते. राम जन्मभूमीवर मंदिर झाले नसते,’ असं सांगत मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.


राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून नव्या भारताचे चित्र मांडले आहे. राष्ट्रपतींचे भाषण सगळ्यांना दिशा आणि प्रेरणा देणारे आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करणार आहे. मात्र, सरकारला सगळ्या कामांची इतकी घाई का आहे? सगळेच काम एकत्र का करत आहेत? असा सूर विरोधकांमधून लावला जात आहे,’ असे म्हणत मोदी यांनी सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या कवितेतून प्रत्युत्तर दिले.


लोकांनी केवळ सरकार बदलली नाही, तर देशात बदल होण्याचीही अपेक्षा ठेवली. नव्या विचाराने काम करण्याची देशाची इच्छा आणि अपेक्षा आहे. त्यामुळेच आम्हाला इथे येऊन काम करण्याची संधी मिळाली आहे. आम्हीही तुमच्याच रस्त्याने चालत राहिलो असतो, तर ७० वर्षानंतरही ३७० कलम हटवले गेले नसते. तुमच्याप्रमाणेच काम केले असते, तर मुस्लीम महिलांना आजही तिहेरी तलाकची भिती वाटत राहिली असती. राम जन्मभूमीवरून आजही वाद सुरूच असता. कतारपूर साहिब कॉरिडॉरही झाला नसता. तुमच्याच मार्गाने चालत राहिलो असतो, तर भारत-बांगलादेश वाद कधीच सुटला नसता,” असे म्हणत मोदींनी काँग्रेसला धारेवर धरले.
Powered By Sangraha 9.0