वर्धा : वर्धामधील हिंगणघाट येथे सोमवारी एका तरुणीला भर रस्त्यामध्ये जिवंत जाळण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्रभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभर आंदोलने आणि हिंगणघाटमध्ये बंद पाळण्यात आला आहे. तरुणीला जाळणारा नराधम विकेश उर्फ विकी नगराळे याला पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले होते. सध्या त्याला गुप्तपणे न्यायालयामध्ये झांजर करण्यात आले आहे. परंतु, पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या नराधमाला त्याला केलेल्या कृत्याचा पच्छाताप नसल्याचे वक्तव्य केल्याचे समोर येत आहे. तसेच हे कृत एकतर्फी प्रेमातून केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे आरोपी हा विवाहित असून त्याला एक लहान मुलगी आहे. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच गावात राहत होते. विक्की आणि पीडित तरुणी अनेकदा शिक्षणासाठी एकाच बसमधून प्रवास करायचे. मात्र, पीडित तरुणी आरोपीशी बोलणे टाळत होती. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपीने याआधीही पीडित तरुणीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्याने तिच्या घरच्यांसमोर मी विष पिऊन अंतःत्या कारेन अशी धमकी दिली होती, पण यावेळी तिच्या घरच्यांनी त्याची समजूत काढून प्रकरण टाळले होते, अशी माहिती तरुणीच्या घरच्यांनी दिली.
पीडित तरुणी शिकवणीसाठी महाविद्यालयात जात असताना त्याने डाव साधत तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले आणि तेथून पळ काढला. या घटनेची माहिती काळातच पोलिसांनी तेथे पाचारण केले. त्यानंतर फरारी असलेल्या विकी नगराळेला काही तासांमध्येच बेड्या ठोकल्या. सध्या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपीच्या कृत्याचा राज्यभरातून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. आरोपीला भर चौकात फाशी द्या, जसे तिने त्या तरुणीवर हल्ला केला तसाच त्याच्यावरही करा, त्याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या हिंगणघाट ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थिनींकडून केला जात आहे. महाराष्ट्रभर या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहे.