वर्धा : सोमवारी वर्धामधील हिंगणघाट येथे तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आधी जालनामध्ये तरुणीचा विनयभंग करण्यात आला आणि आता एका महिलेला भर रस्त्यात जाळून टाकण्यात आले. तर, महाराष्ट्रामधील सावित्रीच्या लेकी सुरक्षित आहेत का? असा सवाल महिलांकडून करण्यात येत आहे. तसेच, भाजप नेत्या चित्र वाघ यांनी विकृतांना कायद्याची आणि पोलिसांची भींती उरली नाही का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
"राज्यामध्ये कायद्याचे धिंडवडे निघत आहेत. विकृतांना कायद्याची पोलिसांची भिती उरलेली दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये स्वत: लक्ष घालून आरपीवर कडक कारवाई करावी आणि पिडीतेला न्याय मिळवून द्यावा." अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, 'महिला सुरक्षा फक्त भाषणात नको तर प्रत्यक्षात हवी ही राज्यातील भगिनींना अपेक्षा आहे.' असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे.