नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून दिल्लीमध्ये पेटलेल्या हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी आपले मत व्यक्त केले आहे. ट्विटरवरून त्यांनी देशवासियांना शांतता राखण्याचा संदेश दिला. "शांतता आणि एकोपा आपल्या संस्कृतीचा मूळ गाभा आहे. दिल्लीकरांनी शांतता बाळगावी." असे त्यांनी सांगितले आहे.
"लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी हे सर्वांसाठीच गरजेचे आहे. मी दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा आहे. सुरक्षा दले शांतता प्रस्थापित होण्यासाठी लोकांमध्ये जाऊन काम करत आहेत", असा संदेश पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून दिला आहे.
ईशान्य दिल्लीमध्ये उसळलेल्या हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. अनेक संवेदनशील ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.