मुंबई : "शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारमध्ये संवादाचा अभाव आहे, त्यांनी संवाद करावा मग विरोधी पक्षाला चहापानाचे निमंत्रण द्यावे," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोमवारपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी निशाणा साधला. शेतकऱ्याला कर्जमाफी नाही आणि कर्जमुक्तीही मिळालेली नाही, नव्या सरकारतर्फे एकही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही, असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला. दरम्यान, उद्या होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सर्व तयारी भाजपच्या सर्व आमदारांनी केली आहे. या बैठकीला विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे, अतुल भातखळकर, आशिष शेलार, राधाकृष्ण विखेपाटील, नितेश राणे यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.