एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांचा प्रताप
उल्हासनगर : अंबरनाथ एमआयडीसीत असलेल्या रासायनिक कंपन्यांच्या पाण्याने वालधुनी नदीच्या पात्रात निर्माण झालेल्या 'नारंगी तवंगाने' खळबळ पसरवली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोणती कारवाई करते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या मिल्ट्री तलावातून वाहणाऱ्या पाण्यातून वालधुनी नदी निर्माण झाली असून ती अंबरनाथ एमआयडीसीतून महामार्गाच्या खालून आणि एका वृद्धाश्रमाच्या जवळून वाहणाऱ्या नदीच्या पात्रात ऑरेंज तवंग सातत्याने दिसतो. पुढे या नदीत सांडपाणी मिसळत असल्याने पालेगाव, शिवमंदिर, उल्हासनगर, विठ्ठलवाडी मार्गे कल्याण पर्यंत नदीला गटारगंगेचे स्वरूप येते. एकेकाळी या नदीत मासेमारी केली जात होती. मात्र, केमिकल कंपन्यांचे रासायनिक पाणी आणि सांडपाण्यामुळे गटारगंगेचे स्वरूप मिळालेल्या नदीमुळे मासेमारीच इतिहासजमा झाली आहे.
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत सुमारे ४० कंपन्या असून त्यातील १२, १३ कंपन्या ह्या रासायनिक प्रक्रीया करणाऱ्या आहेत. त्यातून हे नारंगी रंगाचे पाणी नदीच्या प्रवाहात सामाविष्ट होते. वनशक्ती संघटनेचे अश्विन अघोर, वालधुनी जल संघटनेचे शशिकांत दायमा यांनी याबाबत तक्रारी केल्यावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या कंपन्यांना नोटिसाही बजावल्या होत्या. मात्र त्या बेदखल केल्या जात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाने काही वर्षांपूर्वी या नदीच्या पुनरुज्जीवसाठी स्थानिक महापालिका आणि एमआयडीसीला दंड ठोठावला होता.