सोलापूर : 'शिवसेनेत हिंमत असेल तर पुन्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाल्यास शिवसेनेने एकटी निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. या वेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा देखील साधला.
दिल्ली निवडणुकांवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातून भाजपवर आज टीका करण्यात आली आहे. याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, ''आप मतलबी कोण हे जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा कळेलच." दिल्ली निवडणुकांबद्दल देखील चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जणू काय आपण जिंकल्याचा अविर्भावात शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलत आहेत अशी टीका त्यांनी केली.
त्यांच्या पक्षाला ०.२ % आणि ०.१ % मते मिळाली असून भाजपला मात्र ६ टक्के मते जास्त मिळाली असल्याचे पाटील म्हणाले. देशाचे अहित झाले तरी चालेल मात्र भाजप जिंकता कामा नये असे सध्या राजकारण सुरू आहे. जसं काय शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आणि यांच्यामुळे अरविंद केजरीवाल जिंकले अशा अविर्भावमध्ये बोलत असून दुसऱ्याच्या घरी मुलगा जन्मला म्हणून पेढे वाटण्यासारखे काम हे करत असल्याची टीका असल्याची चंद्रकांत पाटील यांनी केली.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ बंगल्यांसाठी १५ कोटींचा खर्च होत असल्याच्या बातमीवरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. आपण ज्या बंगल्यात पाच वर्षे राहिलो त्यात एकदाही साधी रंगरंगोटी देखील केली नाही. बंगल्याची अवस्था चांगलीच होती. सार्वजनिक पैशांचा हा अपव्यय असून काल पर्यंत आम्ही देखील याच बंगल्यात राहिलो आहोत. बेसुमार खर्च करून काय उपयोग, बंगले दुरुस्त होण्याआधी हे सरकार पडेल अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. तर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याच्या फक्त अफवा असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.