कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे व्यवसाय बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्या प्रत्येक निराधार व बेघर नागरिकांना मदतीचा हात भाजप ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे यांनी दिला. समाजातील शेवटचा घटक आपल्या मदतीपासून वंचित राहणार नाही, यांची काळजी कथोरे यांनी कायम घेतली. त्यांच्या कोरोनाकाळात घेतलेल्या मदतीचा आढावा.
किसन कथोरे
राजकीय पक्ष : भाजप
पद : भाजप ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष
मतदारसंघ : मुरबाड विधानसभा
पद : आमदार
संपर्क क्र. : ८३८००१७३१९
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्व शहरे ‘लॉकडाऊन’ करण्यात आली होती. परिणामी, प्रत्येकाचा व्यवसाय बंद झाला होता. भारतात हातावर पोट असणार्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली होती. या निराधार व बेघर नागरिकांना दुपारी व संध्याकाळी आ. किसन कथोरे यांच्या माध्यमातून अन्नदान करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात सुमारे एक लाख २५ हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. काही नागरिकांना अन्नधान्य व किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले. एक महिना पुरेल एवढे किराणा मालाचे किट सुमारे चार लाख २२ हजार ३४९ नागरिकांना देण्यात आले. ग्रामीण भागातील आदिवासी, कष्टकरी, कातकरी समाजासह १२ बलुतेदार आणि शहरी भागातील रिक्षावाले, मुस्लीम वस्ती, पोलीस कर्मचारी, वाहतूक वॉर्डन या गरजूंनाही मदत करण्यात आली. कोरोनाविरोधात लढण्यासाठी त्यांनी एक लाख नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचेही वाटप केले. तसेच प्रत्येकाने मास्क वापरणे, सतत हात धुणे अनिवार्य असल्याची जनजागृती त्यांनी केली. कोरोनाकाळात रक्तदानाची मोठ्या प्रमाणात गरज लागत होती. कोरोनाच्या भीतीने अनेक जण रक्तदान करण्यासाठी घराबाहेर पडत नव्हते. सरकारकडूनही रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यानुसार कथोरे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ५६० जणांनी रक्तदान केले. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सरकारलाही निधीची गरज होती. त्यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना पंतप्रधान साहाय्यता निधींमध्ये काही रक्कम द्यावी, असे आवाहनही केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, कथोरे यांनी ३५ लाख रुपये पंतप्रधान साहाय्यता निधीमध्ये जमा केले.
कोरोनाकाळातील संकट मोठे असल्याने कथोरे यांनी केवळ आपल्या मतदारसंघाचा विचार केला नाही. प्रत्येक गरजूला मदत मिळावी, एवढाच हेतू ठेवून काम केले. ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील एकूण आठ मंडलांमध्ये त्यांनी मदत अभियान राबविले. त्यामध्ये प्रामुख्याने बदलापूर शहर, अंबरनाथ ग्रामीण, मुरबाड शहर, मुरबाड ग्रामीण, कल्याण ग्रामीण, भिवंडी ग्रामीण, शहापूर शहर या मंडलांचा समावेश आहे. हे काम करीत असताना खा. कपिल पाटील आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यासह सामाजिक संस्थांचाही मोठा सहभाग होता. विशेषत: साकिब गोरे या मुस्लीम कार्यकर्त्याने खूप मोठ्या प्रमाणात धान्य व किराणावाटपाचे काम केलेे. कोणतेही काम उभे करताना त्यामागे अनेक हात असतात. तसेच कथोरे यांचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी या कामाला किसन कथोरे मित्रमंडळ, कपिल पाटील फाऊंडेशन, जिजाऊ स्वयंसेवी संस्थांसह इतर सामाजिक संस्थांनी सहकार्य केले. कथोरे यांनी या सर्व मदतकार्यासाठी आतापर्यंत दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये खा. कपिल पाटील, साकिब गोरे तसेच नगरसेवक, मंडल अधिकारी व काही विकासकांनी हातभार लावला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने वाटपासाठी मनुष्यबळ मिळत नव्हते. पण, कथोरे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी उणीव भरून काढली. कार्यकर्त्यांमुळेच चार लाख २२ हजार ३४९ लोकांना मदत पोहोचविता आली. हे काम करताना सरकारी यंत्रणेचे चांगले सहकार्य लाभले. शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांनाही अन्नधान्य मिळावे, यासाठी तातडीची बैठक घेऊन नागरिकांना शिधावाटप केला. त्याला शिधावाटप दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
कोरोना हे संकट मोठे होते. हे संकट सर्वांवरच आले होते. ज्यांच्याकडे इतरांना मदत करण्याची कुवत आहे, त्यांनी सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. मी माझ्या परीने मदत केली. कोणीही गरजू मदतीपासून वंचित राहू नये, हा प्रयत्न आम्ही केला आहे. सर्वांना मदत करण्याची इच्छा व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून आहे.
“कोरोनाकाळात घराबाहेर पडायची थोडी भीती वाटत होती. पण, कुटुंबातून पाठिंबा होता, त्यामुळेच हे काम करू शकलो. या कामात पत्नी कमल यांची मोलाची साथ लाभली. समाजाला आता मदतीची गरज आहे. समाजाला मदत करताना स्वत:चीही काळजी घ्या!” एवढेच कमल यांच्याकडून सांगण्यात आले. जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर कोणत्याही कामात विघ्न आले नाही. कथोरे आणि त्यांचे कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी धावून जात होते. सगळी सुरक्षितता पाळून हे काम केले जात असल्याने कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही, ही एक जमेची बाजू होते. त्यामुळे मदतकार्यात खंड पडला नाही. ग्रामीण भागात नागरिकांना वाकून नमस्कार करणे किंवा हात मिळविण्याची एक पद्धत आहे. कोरोनाकाळात या गोष्टीवर थोडे नियंत्रण ठेवले. स्वत:ची काळजी घेत असताना घरी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करूनच कथोरे दैनंदिन कामाला लागत होते. कोरोना हा गरीब किंवा श्रीमंत व्यक्ती पाहून होत नव्हता. एकाच कुटुंबात चार ते पाच व्यक्तीही कोरोना ‘पॉझिटिव्ह’ येत होत्या. एखाद्या घरातील कर्ता व्यक्ती रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होत असे, त्यावेळी त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले जात असे. एका रुग्णाचे रुग्णालयाचे बिल लाखोंच्या घरात होत होते. एवढे पैसे आम्ही आयुष्यात पाहिले नाही, तर बिल कुठून भरणार, असे त्या रुग्णाचे नातेवाईक प्रश्न विचारायचे. हा प्रश्न कथोरेंच्या मनाला सुन्न करीत होता. या रुग्णांना मदत करणे, त्यांचे बिल कमी करून घेणे, वेळेप्रसंगी एखाद्या रुग्णाला शासकीय रुग्णालयात घेऊन जात होतो, असे सगळेच प्रसंग अंतर्मुख करीत होते.
कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ जाहीर झाला. त्यानंतर एक महिन्याने मुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाशी कथोरे यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यात त्यांनी मास्कच्या किमती बाजारात ६५० रुपये आहेत. सर्वसामान्य माणसाला मास्कची ही किंमत परवडणारी नाही. हा मास्क बनविण्यासाठी १०० रुपये खर्च येत असतो, तरीही कंपनीकडून अतिरिक्त किंमत आकारली जाते. यावर सरकारने नियंत्रण आणण्याची गरज आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर कोरोनाकाळात वाढला. बाजारात मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध झाले. त्यामुळे त्यात भेसळयुक्त सॅनिटायझर असल्याने त्यावर अंकुश असावा. कोरोनाकाळात टीव्हीवर साबणाच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. या सगळ्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. मात्र, यापैकी कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कोणालाही मिळाले नाही. कोरोनाला शिरकाव करून बराच काळ लोटल्यानंतर आता ‘एन-९५’ या मास्कची किंमत ४९ रुपये करण्यात आली आहे. मग यासाठी सरकार सात महिने वाट का पाहत होते कंपनीचा फायदा व्हावा यामागे काही रॅकेट होते का? या प्रश्नाची उत्तरे अनुत्तरीतच आहेत. या वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणणे सरकाराच्या हातात असतानाही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला नाही.
पक्षपातळीवरूनही दररोजच्या मदतकार्याचा आढावा घेतला जात होता. दररोज मार्गदर्शनही मिळत होते. त्यानुसारच मदतीचा ओघ वाढत गेला. चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस, विजयराव पुराणिक, चंद्रशेखर बावनकुळे, संजय उपाध्याय यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. समाजातील कोणाताही घटक मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी कथोरे गेल्या २८ वर्षांपासून प्रयत्नरत आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात १९९२ पासून मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया करून लाखो नागरिकांना दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी साकिब गोरे यांची मदत होते. महिलांसाठी हिमोग्लोबीन वाढण्याच्या गोळ्या देण्याचा कार्यक्रम सुरू असतो. तसेच विधवा महिलांच्या मुलींचे कन्यादान कथोरे यांच्या हातून होत असते. त्यामुळे त्यांचे सामाजिक काम निरंतर सुरूच आहे.
- जान्हवी मौर्ये