सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले समाजसेवक पती जयेंद्र कोळी यांच्या सोबतीने समाजकारणाचे धडे गिरवता गिरवता लोकप्रतिनिधीची धुरा त्यांच्या शिरावर पडली. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका बनल्यानंतर मागे वळून न पाहता जनमानसाप्रति आपली ‘वि’नम्रता त्यांनी सिद्ध करून दाखवली. अशा या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी ‘कोविड’काळात केलेल्या समाजसेवेची ही चित्तरकथा सार्यांनाच भावणारी आहे.
नाव : नम्रता जयेंद्र कोळी
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
पद : नगरसेविका, ठाणे महानगरपालिका
कार्यक्षेत्र : चेंदणी, महागिरी, डॉ. आंबेडकर रोड, खारटन रोड, ठाणे (पश्चिम)
प्रभाग क्र. : २२
संपर्क क्र. : ९८३३३३६२८२
राज्यात ‘लॉकडाऊन’ घोषित झाल्यानंतर लगोलग मार्च महिन्याच्या २२ तारखेला देशात ‘जनता कर्फ्यू’ झाला. पाहता पाहता, कोरोनाची दहशत पसरू लागल्याने सर्वच जण धास्तावले. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्च, २०२० पासून पूर्णतः टाळेबंदी झाल्याने काही दिवसांतच सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले. तेव्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांना गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन केले. त्यानुसार, सर्वच भाजपचे कार्यकर्ते मदतीसाठी सरसावले. ठाणे महापालिकेच्या प्रभाग कमांक २२ मधील भाजप नगरसेविका नम्रता कोळी आणि त्यांचे पती जयेंद्र कोळी या दाम्पत्यानेही कोरोनाची भीती झुगारून जोमाने मदतकार्याला वाहून घेतले.
भाजपच्या कार्यकर्त्यांसमवेत नगरसेविका नम्रता कोळी आणि त्यांचे पती जयेंद्र कोळी यांनी, समाजकारणात केवळ स्वतःच्या प्रभागाची चिंता न वाहता, ठाणे पश्चिमेकडील बहुतांश नागरिकांना विविध प्रकारे मदत व अन्नधान्याच्या किटचे वाटप केले. हातावरचे पोट असणारे गरीब मजूर, रस्त्यावर भिक्षा मागून उपजीविका करणारे भिक्षूक, ठाणे रेल्वे स्थानक व बस थांब्यावर अडकलेले प्रवासी, सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक, तसेच मूळगावी पायी चालत जाणारे परप्रांतातील श्रमिक आदींना ई-पास काढून देण्यासह दररोज मोफत जेवणाची व्यवस्था केली. यासह दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक, अशा सुमारे १२ हजार नागरिकांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी नम्रता व जयेंद्र कोळी या दाम्पत्याने त्यांच्या, ‘आई-बाबा’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पार पाडली. ‘लॉकडाऊन’ अंशतः उठविल्यानंतर श्रमिक मूळगावी परतल्याने मदतीचा हा ओघ थांबला. मात्र, स्थानिक गरजूंसाठी मदतीचा हा रतीब कोळी दाम्पत्याने आजतागायत अव्याहतपणे सुरूच ठेवला आहे.
ठाणे मनपा प्रभाग क्र.२२ मधील खारटन रोड, डॉ. आंबेडकर रोड, क्रांतीनगर, लॉरी स्टॅण्ड, वॉकरवाडी, गवळीवाडा, महागिरी कोळीवाडा, मोहल्ला, मुख्य बाजारपेठ, धोबीआळी, मनोरपाडा, चेंदणी कोळीवाडा (पश्चिम), उथळसर, इंदिरा कॉलनी आदी परिसरातील सहा हजार कुटुंबीयांना तब्बल ३० हजार किलो धान्य व शिधावाटप कोळी दाम्पत्याने केले. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी १५ हजार कुटुंबीयांना आयुष मंत्रालयाने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सुचविलेले प्रतिबंधात्मक औषध ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक औषधी गोळ्यांचे वाटप केले. प्रभागातील झोपडपट्टी तसेच सोसायट्यांमधील घराघरात स्वखर्चाने तब्बल ३० हजार बाटल्यांचे मोफत वाटप केले. याशिवाय, सफाई कर्मचारी, फायलेरिया, ड्रेनेज सफाई कामगारांना वेळोवेळी मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझरसह ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप केले.
"स्वातंत्र्यकाळापासून आजोबा किसन लक्ष्मण कोळी समाजकारणात कार्यरत, तर काका कांती कोळी दहा वर्षे ठाण्याचे आमदार होते. दरम्यान, तरुणपणी दिवंगत आनंद दिघे यांच्या कार्याची भुरळ पडल्याने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पती जयेंद्र कोळी यांनी राजकारणाची कास धरली. भविष्यात राजकारणाबरोबरच पतीसमवेत सक्रिय समाजकारण सुरूच ठेवण्याचा मानस आहे."
आतापर्यंत नऊ आरोग्य शिबिरातून साडेचार हजार नागरिकांची तपासणी करून सर्वांना मोफत औषधवाटप केले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ठाणेकर जनतेसाठी सतत तीन दिवस मोफत ‘अॅन्टिजेन’ तपासणी व ‘आरटीपीसीआर’ तपासणी शिबीर आयोजित केल्याने याचा ४९८ जणांनी लाभ घेतला. या तपासणीत ‘पॉझिटिव्ह’ आढळलेल्या रुग्णांना औषधोपचारासाठी मदतीचा हात देऊन या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. त्याचबरोबर या रुग्णांच्या निकटवर्तीयांसह ‘क्वारंटाईन’ केलेल्या नागरिकांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होऊ नये, याची दक्षता तर घेतलीच; पण प्रत्येकाच्या घरी जीवनावश्यक वस्तूदेखील घरपोच पाठविण्याची व्यवस्थादेखील केली. याकामी योगेश बाबरे, नरेश ठाकूर, अन्वेश जयगडकर, प्रतीक सोळंकी, बाबू भोईर, नितेश तेली, प्रदीप जाधव, राहुल कुंड, विजयेंद्र चटोले, इमरोझ खान, मीनाक्षी मेस्त्री, सुनीता व सुनंदा भोईर आणि निशा गोहील आदी कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे कोळी दाम्पत्याने सांगितले.‘कोविड’काळात प्रभागात सातत्याने कोरोना विषाणुनाशक ‘सोडियम हायपोक्लोराईड’ व धूर फवारणी केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना घरपोच वस्तूंसह औषधोपचार व औषधे पुरविण्याचे कर्तव्य नम्रता कोळी व त्यांचे कार्यकर्ते आजही नित्यनेमाने करीत आहेत. केंद्र शासन पुरस्कृत ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ शिबिराचे आयोजन करून सुमारे ३५६ जणांना प्रत्येकी दहा हजारांचे भागभांडवल मिळण्यास सहकार्य केले.
जुलै महिन्यापासून ऑनलाईन शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके आदी शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करण्यात आले. महापालिकेच्या महर्षी वाल्मिकी आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आरोग्य अधिकारी, परिचारिका, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक हे सर्वजण कोरोना रुग्णांच्या संपर्कात असल्याने त्यांना घरी जाण्यास मज्जाव केला होता. महापालिकेने या ४० कर्मचार्यांची राहण्याची सोय हॉटेलमध्ये केली होती. या सर्वांना सतत तीन महिने भोजन पुरविण्याचे काम जयेंद्र कोळी दाम्पत्याने करून ‘कोविडयुद्धा’त खारीचा वाटा उचलला. त्याचबरोबर आताच्या बिकट काळात संसाराचा गाडा हाकणार्या महिलावर्गाच्या समुपदेशनाची जबाबदारीदेखील पार पाडली.