सामाजिक स्थिती बदलली गेल्याने अनेकांना आरोग्य रक्षणाच्या उपायाबरोबरच जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचीही निकड या काळात भासू लागली. हीच गरज ओळखून बोलकर यांनी सुमारे ८०० पेक्षा जास्त कुटुंबांना किराणा मालाचे वाटप केले. त्यात त्यांनी तेल, गहू, पीठ, साखर, मसाल्याचे पदार्थ आदींचे वाटप केले. सुमारे दहा हजारपेक्षा जास्त कुटुंबांना त्यांनी ‘आर्सेनिक’ गोळ्यांचे वाटप करत, त्या कुटुंबांना आरोग्यकवच उपलब्ध करून दिले. तसेच, गरजू महिलांना साड्या व विविध वस्त्रांचे वाटप करत त्यांनी वस्त्रदानासही या काळात महत्त्व दिले. दिवसागणिक विविध सामाजिक समस्या या काळात पुढे येत होत्या. त्यातच रोजगार जाणे, आर्थिक उपलब्धता नसणे, घरातील सामान संपणे, नवीन किराणा मालासाठी हाती पैसे नसणे, रस्त्यावरून जाताना सर्वकाही बंद असल्याने अन्नाची उपलब्धता न होणे आदी समस्या बोलकर यांना जाणवू लागल्या. त्यामुळे बोलकर यांनी दि. 1१८ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ‘अटल भोजन’ या नावाने अन्नछत्राची उभारणी केली. या माध्यमातून त्यांनी दररोज साधारणत: १,५०० नागरिकांना अन्नदान केले. याचा लाभ जवळपास ३० हजार नागरिकांना झाला. बोलकर यांनी आपल्या प्रभागातील अशोकनगर, विश्वासनगर, राधाकृष्णनगर, पिंपळगाव बहुला, सातपूर कॉलनी आदी भागांत मदतकार्य केले. त्याचबरोबर त्यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणेकामी ‘रॅपिड टेस्ट’ करण्यासदेखील उत्तेजन दिले. दररोज साधारण १४० ‘रॅपिड टेस्ट’ त्यांनी या काळात केल्या. त्यात साधारण २० टक्के नागरिक हे कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून येत असत. त्या सर्वांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य बोलकर यांनी केले.
अशा प्रकारची महामारी ही भविष्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा समाजातील सक्षम नागरिकांनी गरजू नागरिकांना कायम मदत करणे आवश्यक आहे. मानव धर्म जोपासून मानवाने मानवाची अविरत सेवा कारवी. त्यामुळे आपण कोणत्याही संकटाचा मुकाबला अगदी सहजपणे करू शकतो.
बोलकर यांचे मदतकार्य हे जवळपास प्रत्येक बाबतीत होत असल्याने त्यांच्याकडे गरजवंतांची संख्या अधिक होती. त्यामुळे मदत प्राप्त करण्याकामी गर्दी मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा न उडू देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. तसेच, सुरुवातीला लोकांचा प्रतिसाद मिळेल की नाही, अशी शंकाही बोलकर यांना होती. मात्र, लोकांचा उदंड प्रतिसाद त्यांना लाभला. पैशाची कमतरता जाणविण्याचीही भीती होतीच. या सर्वावर बोलकर यांनी कार्यकर्ते, मित्र परिवार यांच्या साथीने मात केली.
मदतकार्याचा हेतू हा शुद्ध असल्याने आणि मनापासून बोलकर या कार्यात कार्यरत असल्याने त्यांना सरकारी पातळीवर मोलाचे सहकार्य लाभले. पोलीसदलालाही जेवण उपलब्ध करून देण्याचे कार्य या काळात बोलकर यांनी पार पाडले. माधुरी बोलकर यांच्या सासू मीराबाई बोलकर, पती गणेश बोलकर यांचा अविरत असणारा पाठिंबा त्यांच्यासाठी मोलाचा ठरला. तसेच, समर्थ व स्वामिनी या त्यांच्या दोन लहान मुलांनीदेखील आईच्या या कार्यात खारीचा का होईना, वाटा उचलला होता. माधुरी बोलकर यांचे पती गणेश यांनी, त्यांना आपण समाजाचे देणे लागत असून मदतकार्यात कोठेही मागे हटायचे नाही, असे सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना साथ दिली. तसेच, भाजप पक्षपातळीवर शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेशाचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे, माजी मंत्री जयकुमार रावल यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन बोलकर यांना लाभले.