कोरोना काळात ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यावर सर्वच नागरिक घाबरलेले होते. रोजगार बंद झाल्याने अशा काळात हातावर पोट असणारे व सर्वसाधारण काम करणार्या नागरिकांवर फारच वाईट परिणाम झाला. अशा काळात देवांग यांनी धान्य, अन्न, किराणा व इतर जिन्नसांचे वाटप करण्यावर भर दिला. या काळात त्यांनी जवळपास चार ते पाच हजार नागरिकांना मदत केली. तसेच, बचत गटांच्या महिलांना मास्क बनविण्याचे काम देत त्यांना रोजगाराच्या संधीदेखील त्यांनी उपलब्ध करून दिल्या.
नवीन नाशिक (सिडको) हा परिसर तसा कामगार वस्तीचा. त्यामुळे सिडको परिसरातील नागरिकांना, सेवावस्तीतील नागरिकांना, तसेच परराज्यातील नागरिकांना देवांग यांनी अन्न, पाणी, बिस्किट्स, फळ यांचे वाटप केले. तसेच प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी जंतुनाशक फवारणी व सॅनिटायझरचे वाटप करण्यावर देवांग यांनी भर दिला. कोरोना काळात हे सर्व कार्य नाशिक महानगर प्रभाग क्र. २९ तसेच नवीन नाशिक (सिडको) परिसरात केले. यासाठी देवांग यांना रमेश रामजी उघडे, सचिन महाजन, राजेंद्र खानकरी, पंकज कुलकर्णी, पंकज भामरे, रामेश्वर नेमोड, विठ्ठल वाकडे, कांबळे, मिलिंद जाधव आदी कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच गणेश चौक परिसरातील माऊली लॅब, जैन संघटना, साधना फाऊंडेशन, माहेश्वरी समाज, शुभम पार्क मित्रमंडळ, श्री संत गजानन महाराज संस्था, गणेश चौक मित्र मंडळ आदी संस्थांचे मोलाचे सहकार्य देवांग यांना काळात लाभले. या मदतकार्यासाठी जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांचा निधी देवांग यांनी खर्ची केला.
संकटकाळी दुसर्याला मनापासून मदत करावी, खरोखरच वेगळाच आनंद मिळतो. सत्कर्म केल्याचे समाधान लाभते. माणूस म्हणून प्रत्येकाने मानवधर्म जोपासणे आवश्यक आहे. संकटात जो साथ देतो, तोच खरा साथीदार असतो.
देवांग यांचा परिवार म्हणजे सहा भावंडांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारात एकूण ३० सदस्यांचा समावेश आहे. धान्य पॅकिंग, अन्न शिजविणे, त्याचे वाटप करणे, अशा कामांत तसेच परिसरात फिरुन कुणाला काही अडचण असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी परिवाराची मोलाची साथ लाभल्याचे देवांग नमूद करतात. भाजपच्यावतीने कोरोना काळात कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात आले होते की, जनतेपर्यंत पोहोचून मदत करावी. त्यामुळे कार्य करण्यास अधिक उत्साह वाटल्याचे देवांग नमूद करतात. सर्वच वरिष्ठांनी कार्यासाठी शाबासकीची थाप दिली.
कुठल्याही प्रकारची मदत मागितली असता पक्षाने मनापासून मदत केल्याचे देवांग सांगतात. मदत कार्यात गरजू नागरिकांनी नियमांचे पालन केले. तसेच, मदतीबद्दल मनापासून आर्शीवाद दिले व कार्याची खूपच स्तुती केल्याचे अनुभव देवांग यांच्या गाठीशी आहेत. कोरोना काळात रॅपीड ‘अॅन्टिजेन’ टेस्ट करणे सुरु होते. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे टेस्टसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. त्याचवेळी देवांग यांच्याकडे एक मुलगा त्याच्या आईला रिक्षात टेस्टसाठी घेऊन आला. त्याच्या आईला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्या महिलेची तपासणी केली असता, संबंधित महिलेचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यांच्या मुलाला लगेच रुग्णालयात त्या महिलेस दाखल करण्याबाबत देवांग यांनी सांगितले, तो मुलगा सरकारी दवाखान्यात गेला असता तेथे खाटा रिकाम्या नसल्याचे समोर आले. खासगी रुग्णालयात उपचार करण्याइतकी त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे तो मुलगा अजून भेदरला. त्याने देवांग यांना याबाबत सांगितले असता, त्यांनी सरकारी रुग्णालयात फोन करून संबंधित आरोग्याधिकार्यास त्या महिलेस दाखल करून घेण्याबाबत सांगितले. त्या महिलेस श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत असल्याने थोडा उशीर हा जीवघेणा ठरला असता, असे डॉक्टरांनी मुलाला सांगितले. हे ऐकून तो मुलगा अक्षरश: रडायला लागला. त्याने देवांग यांची भेट घेत सरळ त्यांचे पाय पकडले. हा प्रसंग देवांग यांचे मन हेलावून टाकणारा ठरला. एकाच वेळी आनंद आणि समाजातील विदारक स्थिती यामुळे मनाची घालमेल देवांग यांनी या प्रसंगातून अनुभवली. अशा बर्याच भावनिक घटना मदतकार्यादरम्यान घडल्याचे देवांग नमूद करतात. अशा वेळेस नागरिकांना मदत केल्याने आपल्या आयुष्याचा समाजसेवेसाठी उपयोग झाला असल्याचे समाधान वाटत असल्याचे देवांग नमूद करतात.
हे सर्व कोरोना काळात कार्यरत असताना देवांग या रोजच मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत होत्या. जेणेकरुन जे गरजूंना मदत करू शकतील, अशांमध्ये मदतीची भावना तयार व्हावी व गरजूंना परिस्थितीपासून धीर मिळावा. समाजहित डोळ्यासमोर ठेवून देवांग यांनी केलेले कार्य हे नक्कीच प्रेरणादायी असेच आहे.