कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे क्षणार्धात सगळे ठप्प पडले. माणसाच्या हालचालींबरोबरच औद्योगिक चक्रही मंदावले. गरीब, मजुरांपुढे तर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. अशा कठीण समयी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सुजाता पालांडे गरजूंच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी सामान्यांना धीर दिला आणि शिवाय भरीव मदतही केली. तेव्हा, त्यांच्या मदतकार्याची ओळख करुन देणारा हा लेख...
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेविका, पिंपरी-चिंचवड मनपा
प्रभाग क्र. : २०, तुकाराम नगर
संपर्क क्र. : ९८५०९०५१२४
कोरोना... हा शब्द जरी कुणी उच्चारला, तरी हल्ली एकाएकी तणाव वाढतो. २०२० सालातला मार्च महिना उजाडला आणि आपल्या देशात कोरोनाने थैमान घातले. दि. २२ मार्चला पूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ सुरू झालं. लोकं जिथे होती तिथे अडकून पडली. कोणाला काय करावे हे सुचतही नव्हते. रोजंदारीवर काम करणार्या लोकांचे हातातील रोजचे काम एकाएकी ठप्प पडल्यामुळे त्यांच्यासमोर दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला. त्यात मदतीला कुणी नाही, अशी स्थिती. पण, सुजाता पालांडे यांच्या मनात ‘माझा प्रभाग ही माझी जबाबदारी आहे. माझं कुटुंब आहे, मग त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं,’ हा विचार डोक्यात वेगाने सुरू झाला. मग त्यातून त्यांनी ठरवलं की, औषध फवारणी सुरू करायची. खरं तर हा कुठल्याही प्रकारच्या ‘शो-ऑफ’चा भाग नव्हता. मग प्रभागातील गल्ल्या-गल्ल्यांमध्ये पालांडे यांनी स्वत: औषध फवारणी सुरू केली. त्यानिमित्ताने का होईना, लोकांशी संपर्क साधता येईल व त्यांच्या मनाला उभारी देता येईल, असा विचार त्यांनी केला. नागरिकांना अजिबात घाबरू नका, स्वत:ची काळजी घ्या, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळले की, लगेच चाचणी करून घ्यायचाही सल्ला दिला. हे सर्व संदेश सुजाता पालांडे यांनी अगदी खुबीने लोकांपर्यंत पोहोचविले.
सुजाता पालांडे यांच्या प्रभागातील पाच झोपडपट्ट्यांमध्ये विखुरलेला गरीब वर्ग हा भांडीकुंडी करणारा, बिगारी काम करणारा. एकंदरच मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारा. त्यातही अनेक जणांचे गाव हे दुसरीकडे असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरी पुन्हा पाठविण्याची सोयही पालांडे यांच्यातर्फे करण्यात आली. मदतकार्य हे एकट्यादुकट्याचे काम नाही. त्यामुळे पालांडे यांच्यासोबत भाजपचे शेकडो कार्यकर्ते बरोबरीने झटत होते. नागरिकांबरोबर त्या सर्वांची काळजी घेण्याचे कर्तव्यही पालांडे यांनी अगदी चोखपणे बजावले. म्हणून ‘अॅन्टिजेन टेस्ट’चे शिबीर भरविण्यास त्यांनी सुरुवात केली.कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे सणउत्सवांवरही निर्बंध आलेच. कित्येकांची लग्न, बारसे, मुंज, साखरपुडे यामुळे खोळंबले होते. तेव्हा, अशा नागरिकांसाठीही जी जी मदत करता आली, ती पालांडे यांनी केली. मध्यमवर्गीयांबरोबरच गरीब वर्गाचे, रोजंदारीवर जगणार्या मजुरांचे या काळात प्रचंड हाल झाले. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी मग विविध संस्थांच्या मदतीने प्रभागातील सर्व ठिकाणी जवळ-जवळ दोन हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था पालांडे यांनी केली. जवळ-जवळ १००० ते १,२०० लोकांना स्वखर्चाने ८६० रुपयांचा जीवनावश्यक वस्तूंचा किट तयार करून तो गरजूंपर्यंत पोहोचविला गेला. दिव्यांग व्यक्तींनाही स्पेशल रेशन किट करून तो पोहोचविला गेला. प्रभागात फळ-भाज्यांसाठी बाजार ‘सोशल डिस्टन्सिंग’चं पालन करून भरविण्यात आले. तसेच रोगप्रतिकारक शक्तीची पातळी वाढविण्यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या गोळ्या व आयुष काढ्याचे मोठ्या प्रमाणात वाटपही पालांडे यांनी प्रभागात केले. तसेच कोरोनामुळे मनोधैर्य खचलेल्या नागरिकांचे मनोधैर्य प्रबळ करण्यासाठी पालांडे यांनी काऊंसिलिंग युनिटही सुरू केले.
या काळात सुजाताताईंनी अनेकांना मदतीचा हात दिला. त्यापैकी सुजाताताईंनी केलेल्या मदतीचा अनुभव संत तुकाराम नगर, पिंपरीचे रहिवासी असलेले राजेश्री अजय महापुरे आणि अजय राजाराम महापुरे यांनी ताईंबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शब्दबद्ध केला. तो पुढीलप्रमाणे- “प्रिय सुजाताताईस, आज खरंच साश्रू नयनांनी तुमचे आभार कसे मानावेत, तेच कळत नाही. या ‘लॉकडाऊन’ने आयुष्यात खूप काही चांगले-वाईट शिकवले आणि खरंच माणसांची ओळख करून दिली. माझी नणंद आणि त्यांचे पती व माझी पुतणी धार्मिक कार्यक्रमासाठी पुण्यात आले असता, ‘लॉकडाऊन’मुळे माझ्याकडे संत तुकाराम नगर येथे मागच्या दोन महिन्यांपासून अडकले होते. कोरोनामुळे त्यांना त्यांच्या मूळ गावी इचलकरंजीला जाता येत नव्हते. सुजाताताईंनी सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या मूळगावी जाण्याची परवानगी मिळवून दिली आणि इतकेच नव्हे, तर परवानगीचे पत्र त्यांनी स्वतः घरी आणून दिले. खूप ग्रेट आहात ताई तुम्ही!
माझ्या प्रभागासाठी पालिकेचे आरोग्य खातेही माझ्याबरोबरच झटत होते. त्या सगळ्यांची मी खूप ऋणी आहे. अनेक कार्यकर्ते सोबत काम करत होते, तसेच मी सतत प्रभागात ‘कोविड’ रुग्ण, नागरिकांच्या संपर्कात असताना, माझ्या घरातीलही सर्वांना कोरोनाची भीती असूनदेखील ते मला प्रोत्साहन देत होते, त्या सर्वांचीही मी ऋणी आहे.
माझी नणंद दोन महिन्यांपासून आपल्या मुलांपासून दूर होती व आपल्या मुलापासून दूर राहण्याचे दुःख काय असते, ते एक आईच समजू शकते. या दोन महिन्यातील एकही दिवस असा नव्हता की, माझ्या नणंदेच्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत. पण, सुजाताताईंमुळे एक आई आपल्या मुलांना भेटू शकली. तसेच ‘लॉकडाऊन’मुळे पुण्यात अडकल्याने माझी पुतणी पल्लवी हिचेही लग्न रखडले होते. पण, दि. २४ मे २०२० रोजी तिचे लग्नही व्यवस्थित पार पडले. या सर्वांचे श्रेय व आशीर्वाद सर्व सुजाताताईंना जाते. विशेष म्हणजे, ताई परवानगीचे पत्र स्वतः घेऊन घरी आल्या. आपल्या माणसासाठी त्या काय करू शकतात, याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुजाताताई! तुम्ही खरच धाडसी तर आहातच, पण खूप ग्रेट आहात. सलाम तुमच्या कार्याला. याबद्दल संपूर्ण महापुरे कुटुंब आपले सदैव ऋणी व आभारी राहील. तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच तुम्हाला खूप मोठ्या पदावर बघण्याची आमची इच्छा आहे आणि ही इच्छा लवकरच पूर्ण होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना...”
तेव्हा, अशाप्रकारे सुजाता पालांडे यांना हजारो नागरिकांचे आशीर्वाद मिळाले. पण, या काळातील एकूणच अनुभव सांगताना पालांडे म्हणतात की, “जसजसे रुग्णांचं प्रमाण वॉर्डामध्ये वाढत होते, तसतसे मात्र माझेही मनोधैर्य थोडं खच्ची व्हायला लागलं होेतं. ते पाहता, प्रत्येक रुग्णाची विचारपूस करून त्यांना आवश्यक ती मदत पोहोचविण्याची आम्ही सोय केली. पण, या दरम्यान ‘कोविड’ रुग्णांच्या सान्निध्यात आल्यामुळे माझ्या घरातील चारही जण - मी स्वत:, माझी दोन्ही मुलं सुनीत, सार्थ, माझे पती सुनील हे देखील ‘कोविडबाधित’ झाले. मात्र, तरीही त्यांनी माझ्या कामात माझी साथ सोडली नाही.तेव्हा, सुजाताताईंच्या या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
- सुशील कुलकर्णी