''तुघलकी' निर्णय तात्काळ मागे घ्या !' आ.अतुल भातखळकर

04 Dec 2020 14:33:01

MLA atul bhatkhalkar_1&nb



उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हट्टापायी घेतलेला 'तुघलकी' निर्णय मागे घेऊन, ठाकरे सरकारने पोईसर नदी रुंदीकरणातील बाधितांना स्थानिक ठिकाणीच घरे द्यावी- आ. अतुल भातखळकर




मुंबई :
पोईसर नदी रुंदीकरण प्रकल्पात बाधित होणाऱ्या पोईसर व हनुमान नगर परिसरातील बाधितांना चेंबूरला पाठवायचे आणि चेंबूर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माहुल वासियांना मालाड येथील आप्पापाडा येथे पाठवायचा ठाकरे सरकारने घेतलेला 'तुघलकी' निर्णय त्यांनी तात्काळ मागे घेऊन प्रकल्प बाधितांना स्थानिक ठिकाणीच तात्काळ घरे उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली असून ठाकरे सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अधिक ताकदीने संघर्ष करू, असे इशारा सुद्धा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.


पोईसर नदी रुंदीकरणात पोईसर, हनुमान नगर व परिसरातील घरे बाधित होत आहेत. या विषयांत २०१८साली आमदार अतुल भातखळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून प्रकल्प बधितांना स्थानिक ठिकाणीच घरे देण्याचा निर्णय करून घेतला होता. परंतु आता मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हट्टापायी ती घरे पोईसर नदी रुंदीकरण प्रकल्प बाधितांना न देता माहुल वासियांना देण्याचा अन्यायकारक निर्णय घेण्यात आला आहे आणि पोईसर व हनुमान नगर येथील बाधितांना चेंबूरला पाठविण्याचा डाव सुरू झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या अन्यायकारक व अव्यवहारीक निर्णयाविरुद्ध व पोईसर नदी रुंदीकरणातील बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी आ. अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रखर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाच्या वेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, मुंबई सचिव राणी द्विवेदी, ज्ञानमूर्ती शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे, नगरसेवक शिवकुमार झा, सागर सिंग, नगरसेविका सुरेखा पाटील, सुनिता यादव, दक्षा पटेल यांसह शेकडो प्रकल्प बाधित उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0