नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. हा या मालिकेचा ७२वा भाग, तसेच २०२० वर्षाचा शेवटचा भाग होता. यामध्ये जनता कर्फ्यू, मेड इन इंडिया, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल, अशा विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केले. पंतप्रधान मोदींनी नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख केला. "या सगळ्या पत्र आणि संदेशांमध्ये मला एक गोष्ट समान दिसली की बहुतेकांनी देशाचे सामर्थ्य देशवासीयांच्या सामूहिक शक्तीचे कौतुक केले आहे," असे मोदी म्हणाले.
आत्मनिर्भरतेबद्दल सांगतना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, "जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग जेव्हा संपूर्ण जगासाठी प्रेरणा बनला. देशवासीयांनी टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून आपल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून आपली एकता दाखविली. त्याचे लोकांनी स्मरण केले आहे. कोरोनामुळे जगातील पुरवठा साखळीत अडथळे आले, परंतु आम्ही प्रत्येक संकटापासून नवीन धडे घेतले. देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली ती म्हणजे ‘आत्मनिर्भरता’ होय."
पुढे व्होकल फॉर लोकल या विषयावर बोलताना ते म्हणाले की, "व्होकल फॉर लोकल या मंत्रानुसार आपली उत्पादने ही जागतिक दर्जाची असायला हवीत. दरवर्षी नवीन वर्षाचा संकल्प करतो, यावेळी आपण आपल्या देशासाठी देखील एक संकल्प करणे आवश्यक आहे. ज्या परदेशी वस्तू आपण वापरतो, त्यासाठी भारतात बनविलेले पर्याय शोधा. भारतातील कष्टकरी लोकांनी त्यांच्या कष्टाने बनविलेल्या उत्पादनांचा वापर करू, असे ठरवा." असे आवाहन सर्व उद्योजकांना केले आहे.
पुढे त्यांनी सांगितले की, "देशातील हजारो वर्ष जुनी संस्कृती, परंपरा वाचविण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे, आजचा दिवस त्याचे स्मरण करण्याचा आहे. श्री गुरु गोविंदसिंग जी यांच्या कुटुंबाने दिलेल्या बलिदानाने संपूर्ण मानवतेला, देशाला एक नवीन शिकवण दिली, आपली संस्कृती सुरक्षित ठेवण्याचे मोठे कार्य केले."
"गेल्या काही वर्षांत भारतातील सिंहांची, वाघांची संख्याही वाढली, वनक्षेत्रही वाढले. सरकारसोबत बरेच लोक, आणि संस्थाही वृक्ष आणि वन्यजीव यांच्या संरक्षणामध्ये सहभागी झाल्याने हे शक्य झाले आहे. हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत. देशातील युवकांना पाहिल्यानंतर मला आनंदी आणि आश्वस्त जाणवते. देशातील युवकांपुढच कोणतेही आव्हान मोथे नाही. करू शकतो, करेन ही भावना त्यांच्यामध्ये आहे. याचबरोबर देशभरात कोरोनाच्या या काळात शिक्षकांनी ज्या अभिनव पद्धती अवलंबल्या, अभ्यासक्रमाची सामुग्री सृजनात्मकरित्या तयार केली. ती ऑनलाईन शिक्षणाच्या या काळात अमूल्य आहे." असे सांगत देशातील युवांचा गौरव केला.
"कश्मीरी केशर प्रामुख्याने पुलवामा, बडगाम आणि किश्तवाड़ सारख्या ठिकाणी उगवलं जातं. याच वर्षी मे महिन्यात काश्मिरी केशरला भौगोलिक संकेत टॅग म्हणजेच जी टॅग (GI Tag) देण्यात आले. याच्या माध्यमातून आपण काश्मिरी केशराला एक जागतिक लोकप्रिय ब्रँड बनवू इच्छितो. त्यामुळे केशर उत्पादकांना अधिक चांगला मोबदला मिळण्याचीही शक्यता दिसू लागली आहे." असे पुढे त्यांनी सांगितले.