राजस्थानच्या पोखरणमधील उपक्रम
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - विद्युत तारांना धडकून विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडणाऱ्या संकटग्रस्त माळढोक पक्ष्यांच्या रक्षणासाठी राजस्थानमधील पोखरणमध्ये अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. येथील माळढोक पक्ष्यांच्या अधिवासातून जाणाऱ्या विजेच्या तारांना 'फायरफ्लाय बर्ड डायव्हर्टर' लावण्यात आले आहेत. ज्यामुळे हे पक्षी विजेच्या तारांना धडकण्यापासून वाचतील. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन सोसायटीने (डब्लूसीएस) हा उपक्रम हाती घेतला आहे.
भारतामध्ये माळढोक पक्ष्याचा अधिवास संकाटात सापडला आहे. नैसर्गिक अधिवासामध्ये केवळ १५० पेक्षा कमी माळढोक शिल्लक राहिल्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये राष्ट्रीय हरित लवादकडे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सादर केलेल्या अहवालातून निदर्शनास आले होते की, थार प्रदेशामधून जाणाऱ्या उच्च-व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन या माळढोक पक्ष्यांसाठी सर्वात मोठा धोका आहेत. कारण, आकाराने मोठ्या असणाऱ्या माळढोक पक्ष्यांना शरीराचे वजन आणि इतर कारणांमुळे हवेमध्ये तातडीने दिशा बदलता येत नाही. परिणामी उडताना समोर विद्युत वाहक तारांना ते धडकतात आणि विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू होता. अशा पद्धतीने माळढोकच्या एकूण संख्येपैकी १५ टक्के संख्या विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडली आहे.
राजस्थानमधील शुष्क प्रदेश हा माळढोक पक्ष्यांचा प्रमुख अधिवास आहे. याठिकाणाहून जाणाऱ्या विद्युत वाहक तारांना धडकून माळढोक पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे याठिकाणी भूगर्भ पाहणी आणि राजस्थान वन विभागाशी सल्लामसलत करुन चाक ते ढोलीया या गावादरम्यान अंदाजे ६.५ कि.मी. दरम्यान 'फायरफ्लाय बर्ड डायव्हर्टर' लावण्यात आले आहेत. या डायव्हर्टरना फायरफ्लाय असे म्हणतात. कारण ते दूरपासून दिसतात आणि रात्रीच्या विजेच्या तारांवर चमकतात. हे डायव्हर्टर विद्युत वाहक तारांना लावल्यानंतर पक्षी त्यांना सुमारे ५० मीटरच्या अंतरापर्यंत पाहून आपला उड्डाणमार्ग बदलतात.