"मुलांनो, बोला मोकळे व्हा आणि निर्भय बना"- मिलिंद पोंक्षे

15 Dec 2020 16:43:54

kids_1  H x W:




कोरोनाकाळामुळे मुलांच्या बदलत्या भावविश्वाचा वेध घेण्याचा "जाणीव" कडून प्रयत्न

वाडा: कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शाळा नऊ महिने बंद होत्या, टाळेबंदी नंतर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले, त्याचे फायदे-तोटे विचारात घेता मुलांचे भावविश्व बदलून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्या जाणून मुलांच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न राज्यभर एक अभियान राबवून आणि सर्वेक्षण करणार आहेत. वसई येथील "जाणीव" या सेवाभावी संस्थेचे समनव्यक मिलिंद पोंक्षे, त्यांच्या या अभियानाची सुरुवात तालुक्यातील चिंचघर येथील ह.वि. पाटील विद्यालयापासून नुकताच करण्यात आली.
 
 
 
उपस्थित मुलांना समुपदेशन करून त्यांचे प्रश्न जाणून घेताना," बोला,मोकळे व्हा आणि निर्भय बना " असा मोलाचा सल्ला त्यानी दिला.अभ्यासाएवढेच आपण कसे जगावे,वागावे हेही खूप महत्वाचे असल्याचे विविध उदाहरणे देऊन सांगितले. कोरोनामुळे घरोघरी अनेक प्रश्न निर्माण झाले,त्याचा मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला. या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न पोंक्षे यांनी केला.त्यानी काही प्रश्न विचारले, त्याची समर्पक उत्तरेही दिली. त्यांचे प्रश्न होते...ऑनलाईन शिकवणे समजते का?टाळेबंदीत तुमच्या घरी कुठल्या समस्या निर्माण झाल्या, त्याचा तुमच्या मनावर काय परिणाम झाला? तुम्ही कुठल्या तणावात आहात का? या काळात शारीरिक जवळीक साधून तुमचे लैंगिक शोषण झाले का ?असे अनेक प्रश्न विचारण्यात आले.मुलांचा उत्तम प्रतिसाद होता. ऑनलाईन शिक्षणाबाबत नाराजीचे सूर उमटले.
 
 
 
इंटरनेटच्या अमर्याद वापराच्या स्वातंत्र्यामुळे मुलांचे भावविश्व दूषित झाले असून याबाबतीत मार्गदर्शन करताना पोंक्षे यांनी मुले भरकटू नयेत यासाठी इंटरनेटचा वापर कसा करावा, जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग तसेच व्यायामाचे,वाचनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी उपस्थित संस्थेचे संचालक श्रीकांत भोईर यांनी कोविडचा प्रादुर्भाव कमी होऊन शाळा सुरू होत असताना मुलांचे प्रश्न जाणून घेण्याचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक डी. के.पोटकुले,सर्व शिक्षक उपस्थित होते,सूत्रसंचालन शिक्षिका भक्ती पाटील यांनी केले.
 
 


 
Powered By Sangraha 9.0