मुख्यमंत्र्याचा बंगला डिफॉल्टर घोषित ! थकवली २४ लाख रुपयांची पाणीपट्टी
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर मुंबई महानगरपालिकेने मेहेरबानी दाखवली आहे. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासांवर पाण्याची एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची थकबाकी आहे. या बंगल्यांना महापालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले आहे. सामान्य मुंबईकरांनी पाण्याचे बिल न भरल्यास जलजोडणी खंडित केली जाते. मात्र, मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या बंगल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासोबतच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा (तोरणा), उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी), जलसंपदामंत्री जयंत पाटील (सेवासदन), ऊर्जामंत्री नितीन राऊत (पर्णकुटी), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (रॉयलस्टोन), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत) सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन), दिलीप वळसे-पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), राजेश टोपे (जेतवन), विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (चित्रकूट), राजेंद्र शिंगणे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागिरी), छगन भुजबळ (रामटेक), विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (अजिंठा) आणि सह्याद्री अतिथीगृहाचा समावेश आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी असल्याचं समोर आले. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, राजेश टोपे यांचा जेतवन आदी बंगल्यांची पाणीपट्टी थकली आहे.