नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली सरकारवर टीका
नाशिक: “राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या सरलेल्या एका वर्षाचे वर्णन हे मागील 25 वर्षात राज्याला मागे घेऊन जाणारे सरकार असेच होऊ शकते. हे सरकार सर्वच आघाड्यांवर हे सरकार नाकर्ते ठरले आहे. कोणताही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न देखील सरकारने केलेला नाही. त्यामुळे हे सरकार अपयशी आहे असे देखील म्हणून शकत नाही.” असे घणाघात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले. ते वसंतस्मृती या भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
बाजार समितीत शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेत बाजार समिती शेतकऱ्यांसाठी नाही, हे सरकारने दाखवून दिले. शिवाय राज्यात कोरोना संकट परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र मागे राहिला. अन्य राज्यांची या विषयात कामगिरी उत्तम होती. याच काळात राज्यातील शेतकऱ्यांची देखील फसवणूक करण्यात आली असल्याचे भंडारी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, आमदार सीमा हिरे, आमदार ऍड.राहुल ढीकले, आमदार देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, शहर अध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर आदी उपस्थित होते.