'आरेतील भूखंड खाण्याचा काँग्रेसचा डाव भाजपानेच हाणून पाडला होता'

07 Nov 2020 19:44:54

ashish shelar_1 &nbs



मुंबई :
आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर करावा, असा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता, मात्र फडणवीस सरकारने आरेच्या जागेची अंतिम अधिसूचना प्रकाशित करताना आरेच्या जागेच्या व्यावसायिक वापराचा निर्णय रद्द केला, काँग्रेसचा भूखंड खाण्याचा सराईत डाव भाजपाने त्यावेळी हाणून पाडला होता. हे सत्य वेडेपणात, माध्यमातून चमकायच्या नादात सचिन सावंत यांनी स्वतःच उघड केले. त्यामुळे त्यांचे आभारच मानायला हवेत, असा पलटवार भाजप नेते आमदार अ‍ॅड.आशिष शेलार यांनी केला.



आरेची जागा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणायची होती, असा आरोप करून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अज्ञानाचे पुन्हा एकदा प्रदर्शन करीत, अतिशहाणपणाचा भाग-२ सादर केला आहे. त्याचा कागदोपत्री पुरावे सादर करुन अ‍ॅड.आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला. तसेच काँग्रेसचे पितळ उघडे पाडले. सावंत यांनी आता हे सारे बोलून महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना पण संशयाच्या भोवऱ्यात आणले आहे. कारशेड स्थलांतरीत करुन आरेतील जागेचा वापर अन्य गोष्टींसाठी करणार असे सांगणारे विद्यमान मुख्यमंत्री, या जागेचा वापर नेमका कशासाठी करणार? की सत्तेतील पार्टनर असलेल्या काँग्रेसला हा भूखंड खाण्यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री मदत करणार, असा सवालही आता या निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळे या जागेचा वापर व्यवसायिक होणार नाही याचे वचन मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना द्यावे. सचिन सावंत हे रोज अशाच प्रकारे बोलत राहिले तर अजून बरेच बाहेर येईल, त्यामुळे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

अधिक माहिती देताना शेलार म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात ३ मार्च २०१४ रोजी नगरविकास विभागाने शासन निर्णय क्रमांक एमआरडी-३३११/प्र.क्र. १४९/नवि-७जारी केला. त्यातील १० व्या परिच्छेदात म्हटले आहे की, आरेलगतची ३ हेक्टर जागा ही प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी त्याचा व्यावसायिक वापर करण्यासाठी एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात यावी. सुमारे १००० कोटी रूपये यातून उभे करण्याचा काँग्रेस सरकारचा प्रयत्न होता. पण, भाजप सरकारने हा प्रयत्न हाणून पाडला. असे असतानाही सचिन सावंत हे आरोप का करीत आहेत, असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस सरकारने जेव्हा सर्व जागांचे पर्याय पडताळून पाहिले आणि आरेचीच जागा योग्य असल्याचा निष्कर्ष काढला, तेव्हा त्याची अधिसूचना काढताना आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर होणार नाही, असे अंतिम अधिसूचनेत स्पष्टपणे अधोरेखित केले. सर्व बाबी अतिशय स्पष्ट आहेत त्यामुळे आम्हाला रोज सत्य उघड करण्याची संधी देणाऱ्या सावंतांचे आभार, असेही शेलार यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0