अभ्यासू, समर्पित आणि शिस्तीचा ‘विक्रमी’ कलावंत...

07 Nov 2020 21:27:08

vikram gokhale_1 &nb


रंगभूमी, चित्रपट, मालिका या प्रत्येक माध्यमाची निकड सहजगत्या आत्मसात करणारे, चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणजेच अभिनयसम्राट विक्रम गोखले...



मराठी रंगभूमीने आजवर भारतीय सिनेसृष्टीला अनेक प्रतिभासंपन्न कलाकार दिले आहेत. यामध्ये या अभिनेत्याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ‘दूरदर्शन’वर एका मुलाखतीच्या कार्यक्रमाला चित्रीकरणासाठी उपस्थित होतो. या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेतल्या जायच्या. मी एक प्रेक्षक म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होतो. माझ्या मनात मात्र जे मुलाखत घेणार होते म्हणजे मुलाखतकार, त्यांच्याबद्दल प्रचंड भीती होती. एकतर त्यांनी आजवर केलेल्या भूमिका जबराट होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्यांची शिस्त. वेळेच्या आधी ते सेटवर हजर झाले. सगळ्यांना नमस्कार करत बोलू लागले. त्यांचा हा साधेपणा मला प्रचंड भावला. सहजसाध्या झब्ब्यामध्ये वावरणारा हा माणूस किती ताकदीचा कलावंत आहे हे मी जाणून होतो. माझी ओळख करून देताच, जेव्हा मी त्यांच्या पाया पडायला लागलो, तेव्हा त्यांनी मला जवळ घेतले आणि आशीर्वाद दिला. त्यांचे त्यावेळी बोललेले शब्द आजही माझ्या कानात घट्ट रुतलेले आहेत. हा व्यक्ती बोलायला किती साधा सरळ; पण जेव्हा कॅमेरा ऑन होतो, तेव्हा त्यांच्यात कोण संचारतं, देव जाणे? ते त्या भूमिकेला जीवतोडून न्याय देतात. त्यांच्या जागी दुसरा कुणी शोभणार नाही, हे अगदी मनोमन पटतं. मराठीसह हिंदी सिनेमांमध्येसुद्धा स्वतःच्या अभिनयाची चुणूक त्यांनी वेळोवेळी दाखविली.

नव्या नाटकाच्या तालमीलाही सगळे नट एकाच वेळी उपलब्ध नसतात. त्यामुळे दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वांगीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी आहेत हे एक अभिनेते! अभिनयाचा आणि संगीताचा जन्मजात वारसा लाभलेल्या या अभिनेत्याने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण केले आहे. असे सर्वगुणसंपन्न कलावंत म्हणजेच अभिनेते विक्रम गोखले. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या नायिका म्हणून लौकिक असलेल्या कमलाबाई गोखले या त्यांच्या आजी आणि चरित्रनायक म्हणून ठसा उमटविणारे चंद्रकांत गोखले हे त्यांचे वडील. कलाप्रेमी कुटुंबात आणि हेमावती गोखले या आईच्या संस्कारात विक्रम गोखले यांच्या मनात कलेवरची निष्ठा रुजणे स्वाभाविक होते. वडिलांपासून अभिनयाचा वारसा मिळणारे विक्रम गोखले यांचं नाव आजही घेतलं तरी त्यांच्या चाहत्यांना ‘बॅरिस्टर’ या नाटकामधील त्यांचा दमदार परफॉर्मन्स आठवतो. अभिनयाचा वारसा घरातूनच लाभलेल्या विक्रम चंद्रकांत गोखले यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूल व वि. र. वेलणकर हायस्कूल येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एम.ई.एस. (आताचे आबासाहेब गरवारे) महाविद्यालयात झाले. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

बालवयातच त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून त्यांनी ‘आग्य्राहून सुटका’, ‘राजसंन्यास’, ‘बेबंदशाही’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या. तर याच काळात त्यांनी ‘शेवग्याच्या शेंगा’ या चित्रपटात पहिल्यांदा अभिनय केला. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होय. मराठी चित्रपटात नायक म्हणून ‘अनोळखी’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. स्पष्ट आणि स्वच्छ शब्दोच्चार, उत्तम संवादफेक, देखणे-रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि अभिनयातील सहजता या त्रिवेणी संगमातून मराठी आणि हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटात आशा काळे, नयनतारा, सतीश दुभाषी अशा कलाकारांबरोबर विक्रम गोखले यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. १९८९मधील ‘कळत नकळत’ आणि १९९१साली प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ या दोन्ही मराठी चित्रपटांत परस्परांहून वेगळ्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या. याशिवाय ‘कुंकू’, ‘मुक्ता’, ‘लपंडाव’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. तसेच ‘वर्‍हाडी आणि वाजंत्री’, ‘बिजली’, ‘आधारस्तंभ’ आदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या. ‘वजीर’ (१९९४) या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ अ‍ॅवॉर्ड मिळाले, तर त्यांनी डॉक्टरी पेशावर आधारित कथेवर ‘आघात’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. ‘अनुमती’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना २०१३मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच ‘कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ व ‘न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्येही त्यांना या चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

नामांकित निर्मिती संस्थांच्या हिंदी चित्रपटांतही विक्रम गोखले यांनी आपल्या हिंदी शब्दोच्चारांनी आणि सहजसुंदर, परिपक्व अभिनयाने आपला ठसा उमटविला आहे. ‘इन्साफ’, ‘खुदा गवाह’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हे राम’, ‘भुलभुलैया’, ‘मदहोशी’, ‘तुम बिन’, ‘चॅम्पियन’, ‘लाडला’, ‘हसते हसते’, ‘शाम घनश्याम’, ‘अग्निपथ’, ‘ईश्वर’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘मिशन ११ जुलै’, ‘सो झूठ एक’, ‘गफला’, ‘धुवाँ’ या हिंदी चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. विक्रम गोखले यांनी ‘अपराध मीच केला’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘जास्वंदी’, ‘स्वामी’, ‘महासागर’, ‘जावई माझा भला’, ‘बॅरिस्टर’, ‘दुसरा सामना’, ‘आणि मकरंद राजाध्यक्ष’, ‘संकेत मिलनाचा’, ‘खरं सांगायचं तर’, ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘नकळत सारे घडले’ इ. नाटकांत मुख्य भूमिका केल्या होत्या. विजया मेहता यांच्या ‘बॅरिस्टर’ नाटकातील त्यांची मध्यवर्ती भूमिका खूप गाजली. कोणत्याही भूमिकेशी समरस होऊन ताकदीने ती भूमिका जिवंत करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. कामावर असलेल्या निष्ठेने आणि समर्पणाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ‘ढाई अक्षर प्यार के’, ‘जरा मुस्करा दो’ या हिंदी नाटकांशिवाय ‘दूरदर्शन’ मालिकांमध्येही त्यांचा सहभाग आहे. ‘विरुद्ध’ या मालिकेतील ‘धीरेंद्रराय सिंघानिया’ या त्यांनी साकारलेल्या भूमिकेची खूप चर्चा झाली. ‘जीवनसाथी’, ‘संजीवनी’, ‘मेरा नाम करेगी रोशन’ या हिंदी मालिका आणि ‘या सुखांनो या’, ‘अग्निहोत्र’ या मराठी मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केलेला आहे.

मराठी व हिंदीसह त्यांनी १७गुजराती, दोन तामिळ व एक कन्नड या भाषांतील चित्रपटांतूनही काम केले. आपल्या परीने ते लेखनही करतात. नाट्य-चित्रपट संदर्भातील विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे येथे अतिथी प्राध्यापक म्हणून ते व्याख्याने देतात. अभिनय क्षेत्रात भारदस्त कामगिरी करतानाही सामाजिक भान आणि खरेपणा जपणार्‍या या मनस्वी कलाकाराने ‘पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’चीही स्थापना केलेली आहे. तसेच त्यांना छायाचित्रणाचाही छंद आहे. चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन मालिकांमध्ये व्यग्र असले, तरी एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून त्यांच्याकडे सभोवतालचे भान आणि चिंतन निश्चित आहे. विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार. नाटकाचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, याचे बाळकडू त्यांना बाईंकडून मिळाले. १९१३साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. त्यात ते एका वेगळ्या अंदाजात दिसतात. त्यांचा सहजसुंदर अभिनय ही जमेची बाजू आहे. त्यांच्या पाठीमागे ‘बिग बीं’चा फोटोदेखील पाहायला मिळतो. या चित्रपटात ‘बिग बी’ यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका पार पाडली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे.
विक्रम गोखले यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता, अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले. जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. मग ती भूमिका ‘माहेरची साडी’ सारख्या सिनेमातली का असेना, रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी या प्रत्येक माध्यमाची निकड त्यांनी सहजगत्या आत्मसात केली. त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कलाक्षेत्रातले ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे धनी होऊ शकले. ते कलेचा साकल्याने विचार करणारे, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे, त्यासंदर्भात बांधीलकी जपणारे एक कर्ते रंगधर्मी आहेत, म्हणूनच रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या त्यांच्या ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबविले नाहीत. दुसरीकडे सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला आहे. ‘कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करतात. अभिनेता विक्रम गोखले यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला अनेक गाजलेले चित्रपट दिले. ‘कळत नकळत’, ‘सावरखेड एक गाव’, ‘अनुमती’, ‘नॉट ऑन्ली मिसेस राऊत’, ‘मुक्ता’, ‘दुसरी गोष्ट’, ‘नटसम्राट’ आदी सिनेमांमध्ये विक्रम गोखले यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या आहेत. २०१०साली विक्रम गोखले यांनी ‘आघात’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले. या सिनेमाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुक झालं. काही वर्षांपूर्वी विक्रम गोखले हे ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. परंतु, शारीरिक कारणांमुळे विक्रम गोखले यांनी या नाटकाचे प्रयोग करणं थांबविलं. २०१३साली ‘अनुमती’ या सिनेमासाठी विक्रम गोखले यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच २०१२साली रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. अशा दिग्गज अभिनेत्याला मानाचा मुजरा आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीस आभाळभर शुभेच्छा.


- आशिष निनगुरकर
Powered By Sangraha 9.0