प्राजक्ता म्हणते मीच मालिका सोडली !

04 Nov 2020 19:11:56

Prajakta Gaikwad_1 &
 
 
पुणे : 'आई माझी काळूबाई' ही मालिका पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडली आहे. याचे कारण म्हणजे मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडविरोधात केलेले आरोप. या आरोपांना उत्तर देत प्राजक्ताने अलका कुबल यांच्या सर्व आरोपांचे खंडन तर केलेच, शिवाय 'मालिकेतून काढले नाही, तर मीच मालिकेतून माघार घेतली' असेही तिने स्पष्ट केले. तसेच, मालिकेतील सहकलाकार विवेक सांगळे याने चित्रीकरणादरम्यान अनेकदा शिवागाळ केला, असा आरोपदेखील प्राजक्ताने केला.
 
 
प्राजक्ताने पत्रकार परिषदेत म्हंटले आहे की, "माझ्यावर लावलेले सगळे आरोप हे खोटे आहेत. त्यांनी मला काढले नाही, तर मी स्वतः मालिकेतून माघार घेतली. सहकलाकार विवेक सांगळे याने माझ्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तरीही, केवळ मालिका चालवण्यासाठी नराधमांना पाठीशी घालणे योग्य आहे का? त्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर माझी लाज काढता. तुम्ही ३५ वर्षांपासून या चित्रसृष्टीत आहात. तुमची अशी भूमिका धक्कादायक आहे. ज्या माऊलीने मला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. त्या आईबद्दल कोणी अपशब्द काढले, तर ते मी कसे ऐकून घेईन? त्याचे तुम्हाला काहीच वाटू नये?" अशी सतंप्त प्रतिक्रिया तिने मांडली.
 
 
"या पूर्वीही मी 'मी स्वराज्यरक्षक संभाजी'मध्ये २ वर्ष काम केले. तर, 'नांदा सौख्य भरे' या मालिकांमध्येही मी काम केले आहे. या मालिकांच्या निर्मात्यांनी माझी कधीच तक्रार केलेली नाही. हे मला बदनाम करण्यासाठी केलेले कारस्थान आहे. अभिनेत्री अलका कुबल यांच्याबद्दल आजही आदर आहे. त्या माझ्यासाठी आई समान आहेत. आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या सहकलाकारवर कारवाई करण्यात यावी, अशी असे मला वाटत होते. आज त्याने शिवीगाळ केली, उद्या आणखी काही होण्याच्या आधीच या सर्वावर एक निर्माती म्हणून अलका ताईंनी दखल घेणे गरजेचे होते. पण त्यांनी बघू, करू अशी भूमिका घेतल्याने, मी आणखी शूटिंग करू शकत नाही, असं त्यांना सांगितले आणि मालिका सोडली." असे मत तिने व्यक्त केले.
 
 
Powered By Sangraha 9.0