शिवसेना सेक्युलर झाली ! शिवसेना भरवणार 'अजान स्पर्धा'

30 Nov 2020 14:11:37

shivsena _1  H



मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने वारंवार हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून माघार घेत धर्मनिरपेक्षता मुखवटा चढवला. कोरोनाकाळातही धार्मिक स्थळे सहा महिन्यांहून अधिक काळ बंद ठेवली. अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनावरूनही शिवसेनेने केंद्र सरकारला मोठा सोहळा न करता केवळ ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा साजरा करावा असा सल्ला दिला होता.शिवसेनेच्या या बदलत्या भूमिकेवरून भाजपने शिवसेनेवर निशाणा देखील साधला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना नेत्याच्या वक्तव्यामुळे भाजपच्या निशाण्यावर येणार आहे.


शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजानमध्ये फार गोडवा असतो. ती ऐकदा ऐकल्यावर पुन्हा कधी ऐकायला मिळेल, असं मनाला वाटतं राहतं, अशा शब्दांत सकपाळ यांनी अजानचं कौतुक केले आहे. बसीरत ऑनलाईनशी संवाद साधतानाचा सकपाळ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एवढेच नाही तर शिवसेनेनं शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेची माहिती दिली.



'शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही अजान स्पर्धेचे आयोजन करणार आहोत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आवाज, उच्चार हे निकष असतील. ते किती मिनिटांत अजान संपवतात, कशी प्रकारे म्हणतात, याकडे मौलाना लक्ष देतील. ते परीक्षक म्हणून काम पाहतील. अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसं दिली जातील. या संपूर्ण स्पर्धेचा खर्च शिवसेना करेल,' असं सकपाळ यांनी सांगितलं.


काहींना अजानच्या आवाजामुळे त्रास होतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न सकपाळ यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना सकपाळ म्हणतात, त्यावर सगळेच धर्मग्रंथ मानवता आणि शांततेची शिकवण देतात. अजानचा कालावधी फार कमी वेळ असतो. त्यामुळे अजानच्या आवाजाबद्दल अडचण वाटण्याचं काहीच कारण नाही. अशांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असंही सकपाळ म्हणाले. आम्ही मानवतेच्या दृष्टीकोनातून समाजासाठी काम करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सर्वांना सोबत घेऊन काम करत आहेत, असंदेखील त्यांनी पुढे सांगितले.
Powered By Sangraha 9.0