अब्दुल्ला आणि मुफ्ती काश्मीरचे लुटारू…

25 Nov 2020 18:37:22

AMK_1  H x W: 0

अब्दुल्ला आणि मुफ्ती काश्मीरचे लुटारू

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांचा घणाघात


नवी दिल्ली, पार्थ कपोले : अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंबाने गेली ७० वर्षे गोरगरिब काश्मीरी जनतेच्या जमिनी लुटल्या आणि देशात – परदेशात कोट्यावधी रूपयांची संपत्ती जमा केली. काश्मीरी जनतेला कलम ३७० आणि भाजपची कायम भिती दाखविली. मात्र, आता त्यांचे काळे कारनामे उजेडात आले असून आता काश्मीरी जनताच त्यांचा हिशेब करणार आहे, अशी प्रतिक्रिया जम्मू – काश्मीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.

 

जम्मू – काश्मीरमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार रोशनी जमिन घोटाळ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सरकारी जमीनींवर अनधिकृत कब्जा केलेल्यांनाच कवडीमोल दरात त्या जमिनींची कायमस्वरूपी मालकी देणे आणि त्यातून प्राप्त महसुलातून राज्यात उर्जा प्रकल्प उभे करणे, अशी योजना काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सुरू केली होती. मात्र, त्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले असून आता यामध्ये जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख आणि ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह काँग्रेसचाही समावेश असल्याचे पुढे आले आहे.

 

RR_1  H x W: 0  
जम्मू काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना 

 

भाजपने या घोटाळ्याविरोधात भाजपने जाहिर भूमिका घेतली आहे. सध्या काश्मीरमध्ये सुरू असलेल्या पंचायत निवडणुकीसह आगामी विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना त्याविषयी म्हणाले, अब्दुल्ला आणि मुफ्ती दोन्ही कुटुंबांनी गेली ७० वर्षे राज्यातील जनतेला केवळ लुटण्याचे काम केले आहे. काश्मीरी जनतेला कलम ३७० आणि भाजपच्या नावाने अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंबांनी भयभीत केले आणि दिशाभूल केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कलम ३७० संपुष्टात आणल्यानंतर या दोन्ही कुटुंबांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे आणि आता काश्मीरी जनताच त्यांचा हिशेब करेन, असेही रैना म्हणाले.
 
काश्मीरच्या इतिहासात या दोन्ही कुटुंबांचे नाव रक्षक नव्हे तर भक्षक म्हणून नोंदविले जाईल, असे रैना यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, अब्दुल्ला - मुफ्ती यांनी गरिबांच्या जमिनी लुटल्या आणि भारतासह परदेशातही कोट्यावधी रूपयांची संपत्ती जमा केली आहे. काश्मीरमध्ये एवढी वर्षे सत्ताधारीच लुटारू असल्यासारखे वागत होते. मात्र, आता त्यातच बुरखा पूर्णपणे फाटला असून आता जनतेचा विश्वास त्यांनी गमाविला आहे. सध्या सुरु असलेल्या पंचायत निवडणुकीतच त्याचे प्रत्यंतर येईल, असेही रैना यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना नमूद केले.
 

सर्व जमिन ताब्यात घेतली जाणार- मनोज सिन्हा, नायब राज्यपाल

 घोटाळ्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन जम्मू – काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिले आहेत. प्रभावशाली लोकांनी सार्वजनिक संपत्तीची लूट करण्याचे उदाहरण म्हणजे हा घोटाळा आहे. उच्च न्यायालयाचा त्याविषयीचा आदेश हा डोळे उघडणारा असून जमिनीचे वाटप रद्द करण्याचे आणि जमिनीचा ताबा घेण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले आहेत. या आदेशाची एका महिन्यात अंमलबजावणी केली जाईल, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.

 
 
 
Powered By Sangraha 9.0