मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. अशामध्ये आता भाजपनेते नितेश राणे यांनी, 'वायकर, सरनाईक हे फक्त मुखवटे आहेत, मुख्य कलाकार तर कलानगरमध्ये बसले आहेत' असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीच्या पथकाने शोधमोहीम सुरु केली. यावरून आरोप प्रत्यारोपांना आणि राजकीय प्रतिक्रियांना सुरूवात झाली.
"मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक, यांचे भूयारी गटार जाते कलानगरकडे. जरा याचा खोलात ईडीचा तपास झाला आणि भूयारी गटाराच्या माध्यमातून ते गेले तर ते कलानगरकडे पोहोचतील." अशी टीका नितेश राणे यांनी केली. "चुकीचे काही झाले असेल, गैरप्रकार झाले असतील तर प्रत्येकावर कारवाई ही झालीच पाहिजे. ईडी, सीबीआय या देशातील जबाबदार संस्था आहेत. त्यांना काही चुकीचे वाटले असेल म्हणून त्यांनी ही कारवाई केली असावी." असेही पुढे ते म्हणाले.