नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आत्मनिर्भर होण्याचा अर्थात सशक्त होण्याचा नारा दिला. भारत देश यापुढे स्वबळावर सर्व गोष्टी करेल असा आशावाद व्यक्त केला होता. आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे आता भारतीय सैनिकांचे गणवेश सुरत येथे तयार केले जाणार आहेत. भारताच्या पोलीस दलाचे आणि रात्रंदिवस भारत देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या गणवेशाचे कापड आजवर चीन-कोरिया वरून निर्यात केले जात होते. परंतु आता सुरतच्या टेक्स्टाईल मिलला १० लाख मिटर कापड तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. रक्षा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित हे संरक्षक गणवेशाचे कापड तयार होत आहे.
दिवाळीपूर्वीच संरक्षक गणवेशासाठी आवश्यक असणारे कापड तपासणीसाठी पाठवले होते. मान्यता मिळाल्यानंतर ५-७ मोठ्या कंपन्या मिळून येत्या २ महिन्यात ह्या कापडाचे उत्पादन पूर्ण करतील. तज्ञ मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली कापडावर आवश्यक त्या प्रक्रिया करून त्याची निर्मिती होणार आहे. त्याचप्रमाणे ह्या कापडाचा वापर सैनिकांच्या पायातले बूट आणि इतर आवश्यक वस्तू सुद्धा तयार करणार आहेत.