लखनौ : उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमध्ये एका अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. हे सर्व लोक एका लग्नसमारंभाहून परतत होते. यावेळी भरधाव चारचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक शेखपूर गावातील एका लग्नसमारंभाला गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. हा अपघात एवढा भीषण होता की काही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ तरुण आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी गॅस कटरच्या सहाय्याने चारचाकीचे भाग कापून गाडीतील मृतदेह बाहेर काढले.
संपूर्ण कारवाई करण्यासाठी पोलिसांना दोन तासांहून अधिक कालावधी लागला. त्यानंतर पोलिसांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मृतांमधील १२ लोक प्रतापगडच्या कुंडा तालुक्यातील जिगरापुर चौसा गावाचे रहिवासी होते. तर, गाडी चालकासोबत दोन लोक कुंडा भागातील दुसऱ्या एका गावातील रहिवासी आहेत. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.