नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये सध्या दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये चकमक सुरु आहेत. गुरुवारी पहाटे पाच वाजता नागोर्ता येथील बान टोल नाक्याजवळ ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्यांमध्ये व जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले.
एका चारचाकीमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बान टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करत चार दहशतवाद्यांना ठार केले. या भागात अजूनही कारवाई सुरू असून, संपूर्ण परिसर लष्कराने सील केला आहे, अशी माहिती देण्यात येत आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर टोल प्लाझा परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
यासोबत, नागोर्ता ते उधमपूरपर्यंतची सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. या परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.यापूर्वी आठ नोव्हेंबरला श्रीनगरच्या माचिल भागात एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी ठार केले होते. या कारवाईदरम्यान बीएसएफच्या एका जवानाला वीरमरण आले होते. तर, एक नोव्हेंबरला जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहीदीन दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ठार झाला होता. या कारवाईत एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती.