मुंबई : भाजप आमदार राम कदम यांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतले होते. पालघर जिल्ह्यातील मॉब लिंचिंग प्रकरणी राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते. राम कदम यांच्या खार येथील निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात होणार होती. मात्र, घराबाहेर पडताच पोलिसांनी राम कदम यांच्यासह १०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली. त्यानंतर हे आंदोलन पोलिसांनी रोखले असल्याचे सांगितले.
राम कदम १८ नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले होते. पालघर हत्याकांड प्रकरणाला २११ दिवस उलटले आहेत. मात्र, अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सकाळपासून राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा हजर होता. यावेळी राम कदम यांच्या जमलेल्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जय अशी घोषणाबाजी सुरु केली. मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी कारवाई करत राम कदम आणि त्यांच्या काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.