मुंबई : येत्या सोमवारी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यावर भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांनी महाविकासआघाडीला टोला लगावला. हिंदुत्त्वाचा विजय झाला, ‘श्रीं’नी सरकारचा अहंकार घालवला, असे तुषार भोसले म्हणाले.
ट्विट करत आचार्य तुषार भोसले यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात, “मी या निर्णयाचं स्वागत करतो. गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील भाविकांनी जो प्रतिसाद दिला. तसेच यासाठी जी आंदोलन केली, या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. हिंदुत्वाचा विजय झाला आणि सरकारचा अहंकार अखेर त्यांना घालवावा लागला,” असे तुषार भोसले म्हणाले. "अहंकार घालवण्याची ताकद मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रींची इच्छाच होती. त्यांनी तो घालवला. आणि पाडव्याच्या मूहूर्तावर मंदिर उघडली गेली. ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. मुख्यमंत्री दिवाळीनंतर मंदिर उघडणार होते, मात्र आमच्या दबावामुळे त्यांना दिवाळीत मंदिर उघडावी लागली आहेत,” असेही त्यांनी म्हंटले आहे.
पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र प्रार्थनास्थळ खुली केल्यानंतर भाविकांना काही नियमावली पाळणे गरजेचे असणार आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. प्रार्थनास्थळे खुली केल्यानंतर सर्वांना नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा आणि स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका, असे काही नियम यात नमूद करण्यात आले आहे.