कंगनाविरुद्ध खटल्यासाठी बीएमसीने खर्च केले ८२.५० लाख !

11 Nov 2020 18:29:38

kangana_1  H x
 
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि मुंबई महानगर पालिकेचा वाद काही नवा नाही. कंगनाने महाराष्ट्र सरकारविरुद्ध आवाज उठवल्यानंतर बीएमसीने कंगनाच्या मुंबईस्थित कार्यालयावर कारवाई करत एक हिस्सा पाडला. त्यानंतर सतत कंगना आणि शिवसेना यांच्यात खटके उडत राहिले. हा वाद उच्च न्यायालयामध्ये गेला आणि कंगना विरुद्ध बीएमसी यांच्यातील न्यायालयीन लढाई सुरु झाली. आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत या खटल्याच्या खर्चासंदर्भात बीएमसीकडून माहिती मागवली होती.
 
 
 
बीएमसीने आरटीआयला उत्तर देताना खटल्यासाठी आत्तापर्यंत ८२.५० लाख खर्च केले असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात बीएमसीने कोणत्या वकीलाची नेमणूक केली आहे? आणि आतापर्यंत या संपूर्ण प्रक्रियेत किती खर्च झाला आहे?, असा प्रश्न आरटीआयमध्ये विचारण्यात आला. आरटीआयला उत्तर देताना बीएमसीने सांगितले की, 'आतापर्यंत फी म्हणून ८२ लाख ५० हजार रुपये भरण्यात आले आहेत.'
 
 
 
यावर उत्तर देताना पालिकेने सांगितले की, "उच्च न्यायालयात या खटल्याची बाजू मांडण्यासाठी आकांक्षा चिनॉय यांची वकील म्हणून नेमणूक केली आहे. बीएमसीच्या वतीने त्या ११ वेळा न्यायालयात हजर झाल्या आहेत आणि त्यासाठी तिला ८२ लाख ५० हजार रुपये दिले गेले आहेत." आरटीआय कार्यकर्ते यादव यांनी कोरोना साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक संकटाशी झुंज देताना, तसेच अशा परिस्थितीत एवढी मोठी रक्कम खर्च करण्याच्या उद्देशाने राज्यात महापालिकेने केलेल्या खर्चावर आश्चर्य व्यक्त केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0