मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिला विश्वास
परभणी : मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरीत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. सोयाबीन, कापूस, हळद या नगदी पिकांना अतिवृष्टीमुळे तडाखा बसला आहे. राज्य सरकारने ही स्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आठवडाभरात या संदर्भातील निर्णय न झाल्यास भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यात दरेकर यांनी हिंगोली, परभणी या जिल्ह्यंना भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तिथल्या एका शेतकऱ्याला त्यांनी ३० हजार रुपये मदतही केली. सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच शासनाने केलेले पंचनामेच विमा कंपन्यांनी ग्राह्य धरावेत, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बागायतदार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार तर कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाजप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभा राहील, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. सेलू तालुक्यातील सततच्या पावसामुळे बाधित पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी, या मागणीचे निवेदन आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दरेकर यांना दिले आहे. सोमवारी त्यांनी बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत आम्ही कायम पाठीशी आहोत, असा विश्वास दिला. या भागातील पंचनामे त्वरित संपवा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.