मुंबई : कोरोनाची महामारी आणि लॉकडाऊन यामुळे मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. तर, ऑनलाइन शिक्षणाची सध्या अंमलबजावणी सुरु आहे. मात्र, आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी, “दिवाळी नंतर राज्यातील वर्ग ९ ते १२ वी पर्यत शाळा सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिले जाणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन मध्ये आता राज्यात अनलॉक सुरू आहे. जवळपास सर्व बाबी या खुल्या करण्यात आल्या असल्या तरी मंदिरे आणि विद्यामंदिरे अजूनही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी दिवाळी नंतर राज्यातील ९ ते १२ पर्यत शाळा सुरू करणार आहे.” असे बच्चू कडू यांनी सांगितले.
“या शाळा सुरु करत असताना सरकारच्या वतीने एक चांगल धोरण आखण्यात येईल. या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोनाने बाधित होणार नाही आणि शिक्षणही व्यवस्थित दिल्या जाईल, अशा प्रकारची भूमिका ही सरकारची आहे. जर एखाद्या शिक्षकाचे वय ५०च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दुसऱ्या शिक्षकाला तिथे घेता येईल का?, तसेच बाधित मुले शाळेत येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करता येईल का? याबद्दलही विचार करण्यात येईल.” असे आश्वासनही बच्चू कडू यांनी दिले आहे.