नवी दिल्ली : धनुष्यबाण हे चिन्ह असलेल्या शिवसेनेला बिहार निवडणूकीत मोठा धक्का बसला आहे. शिवसेना बिहार निवडणूकीत ४० ते ५० जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र, त्यासाठी उमेदवाराला धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार नाही, निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) पक्षाची सत्ता आहे. बाण हे जेडीयू पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणावर नितीश कुमार यांच्या जेडीयूचा आक्षेप आहे. त्यामुळे शिवसेना बिहारमध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढू शकत नाही.
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हामुळे आपल्या मतदारांचा गोंधळ होतो. आमची मते शिवसेनेला जातात, असा दावा जेडीयूने केला. वसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे स्थानिक प्रसिद्ध किंवा ओळखीचे राजकीय पक्ष नाहीत, त्यामुळे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाण ही निशाणी देण्यात येऊ नये, अशी मागणी जेडीयूने केली.
दरम्यान, बिहारमध्ये आमची वाढती ताकद पाहून जेडीयूने मित्र पक्षांनी हा धसका घेतला आहे, अशी टीका शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी केली आहे. देसाई म्हणाले, "शिवसेना बिहार विधानसभा निवडणूकीत ५० उमेदवार देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुक्त चिन्हांपैकी एक चिन्ह शिवसेनेला देण्याची मागणी करण्याचे पत्र निवडणूक आयोगाला लिहीण्याचे निर्देश दिले आहेत."
का नाकारला धनुष्यबाण ?
शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह असले तरीही बिहारमध्ये जेडीयूचे पारडे जड आहे. तसेच महाराष्ट्रात ज्या प्रमाणे इतर कुणीही धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवू शकत नाही किंवा दावा करू शकत नाही त्याच प्रमाणे बिहारमध्ये जदयू हा मोठा पक्ष असल्याने इतर राज्यांतील पक्ष त्याच्या चिन्हाशी साधर्म्य असलेले चिन्ह वापरू शकत नाहीत, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.