हिंसाचारग्रस्त भागात रंगला क्रिकेटचा सामना

31 Oct 2020 19:22:46

cricket 1_1  H

काश्मीरच्या एकेकाळच्या हिंसाचारग्रस्त भागात रंगला क्रिकेटचा सामना

 

काश्मीरी तरुणांसाठी राष्ट्रीय रायफल्सचे विशेष प्रयत्न

 

नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : जम्मू – काश्मीरमधला हफ्रुडा जंगलाचा भाग एकेकाळी सर्वाधिक हिंसाचारग्रस्त म्हणून ओळखला जात होता. मात्र, शनिवारी दहशतीची भाषा आणि गोळीबाराच्या आवाजाऐवजी ‘हाउज दॅट’, ‘सिक्सर’ आणि ‘फोर’ या आरोळ्यांनी हा परिसर दुमदुमला होता. निमित्त होते ‘१५ राष्ट्रीय रायफल्स’च्या स्थानिक तुकडीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘क्रिकेट प्रिमियर लिग’च्या सामन्यांचे. त्यामध्ये तब्बल ३०० स्थानिक काश्मीरी तरुणांनी अगदी उत्साहाने भाग घेतला होता.
 

साधारणपणे १९९० च्या दशकात अतिशय दाट जंगल असलेला हफ्रुडा परिसर हा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होता. या भागातील दाट जंगलाचा वापर करून पाकपुरस्कृत दहशतवादी आणि टोळीवाले करीत आपल्या हिंसक कारवायांसाठी करीत असत. केवळ पाक नव्हे, तर अफगाणिस्तान, इजिप्त आणि सुदान येथील दहशतवादी घटकही या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असत. स्थानिक गावकऱ्यांनी त्यांना विरोध केल्यास हत्या, महिलांवर अत्याचार, तरुणांचे अपहरण असे प्रकार घडत असत. मात्र, भारतीय सैन्याने अतिशय नियोजनबद्ध रणनिती आखून या भागातील दहशतीचे जाळे उध्वस्त केले. साधारणपणे ५० चौरस किलोमीटरच्या जंगल परिसरात गेल्या दोन ते तीन दशकात १ हजाराहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.

 

आता या भागातील रामहल ब्लॉक, त्रेहगाम ब्लॉक आणि त्रालपोरा हे भाग आता अतिशय शांत झाले असून त्यांचा आदर्श आता काश्मीरमध्ये अतिशय महत्वाचा ठरत आहे. केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० संपुष्टात आणल्यानंतर येथील जनतेने निग्रहाने फुटीरतावादी आणि पाकपुरस्कृत दहशवाद्यांना विरोध करून हिंसेचा मार्ग शांतीच्या मार्गात बदलला. कलम ३७० संपुष्टात आणल्यामुळे काय झाले, हा प्रश्न विचारणाऱ्यांना ही एक मोठी चपराकच आहे.

 
या भागातील तरुण वर्गानेही आता आपली उर्जा आणि गुणवत्ता आता सकारात्मक कामांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय लष्करानेही या भागातील तरुणांसोबत विशेष संवाद कायम ठेवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या ‘१५ राष्ट्रीय रायफल्स’च्या स्थानिक तुकडीच्या सहकार्याने ‘क्रिकेट प्रिमियर लिग’चे आयोजन करण्यात आले होते. आयोजनामध्ये सर्वाधिक वाटा हा स्थानिक नागरिकांचा होता, भेनीपोरा, विलगाम आणि हफ्रुडा या तीन ठिकाणी सामने खेळविण्यात आले. त्यामध्ये २४ संघ सहभागी झाले होते, वय वर्षे १८ ते २७ वयोगटातील ३०० स्थानिक तरुणांनी भाग घेतला होता.
 

cricket_1  H x  
 

स्पर्धेचा अंतिम सामना ‘राष्ट्रीय एकता दिनी’ म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी ‘काकरोसा युनायटेड’ आणि ‘युनायटेड मलिकपोरा’ या दोन संघांमध्ये झाला. यावेळी कोरोना संसर्ग ध्यानात घेता संपूर्ण काळजी घेण्यात आली होती, सामना बघण्यासाठी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सामना संपल्यानंतर तरुणांनी रक्तदान करून देशसेवेसाठी कटीबद्ध असल्याची शपथही घेतली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘फिट इंडिया योजने’सही या स्पर्धेमुळे काश्मीरमध्ये बळकटी मिळाली आहे. त्यामुळे काश्मीरचा तरुण आता हाती क्रिकेटची बॅट घेऊन संपूर्ण प्रदेशाला नवा सकारात्मकतेचा मार्ग दाखविण्यास सज्ज झाला आहे.

 
 
 
Powered By Sangraha 9.0