आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यक्त केली गरज
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अर्थव्यवस्थेबद्दल महत्वपूर्ण विधान केले आहे. भारत हा आर्थिक सुधारणांच्या जवळ आहे. वित्तीय संस्थांकडे आवश्यक निधी आहे, असेही ते म्हणाले. माजी नोकरशाह वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के.सिंह यांच्या ‘पोट्रेट्स ऑफ पावर – हाफ ए सेंच्युरी ऑफ बिंग एट रिंगाईड’च्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
“देश निश्चितच आर्थिक सुधारणांच्या जवळ पोहोचला आहे. विकासाला चालना देण्यासाठी वित्तीय संस्थांकडे पर्याप्त जमा निधी आहे, ही महत्वाची बाब आहे. दास यांच्या मते, पर्याप्त निधी जमा करण्यासाठी मी स्वतः बँका आणि एनबीएफसी यांच्याशी बैठक केली आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील दोन्ही संस्थांचा यात सामावेश आहे.”, असे दास म्हणाले.
“कोरोना विषाणू महामारीशी झुंज देण्यासाठी वित्तीय विस्तार करणे गरजेचे आहे. आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने पावले टाकायला हवीत. महामारीवर आपण नियंत्रण मिळवण्यासाठी आर्थिक क्षेत्रातील सुधारणा गतीने करणे गरजेचे आहे. सरकारतर्फे यासाठी मौद्रीक आणि आर्थिक विस्तारीकरणासाठी उदारीकरणाचे धोरण स्वीकारले जाणार आहे.,” असेही ते म्हणाले.
आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, “समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. उद्योग आणि व्यवसायांनाही दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोना महामारी संपुष्टात आल्यानंतर बँक आणि एनबीएफसी यांच्यावर आलेल्या दबावाबद्दही सकारात्मक विश्लेषण केले जाणार आहे.”