मुंबई : महाराष्ट्रात मंदिरं न उघडण्यावरून राजकारण आता अधिकच पेटू लागलं आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील उडी घेतली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते, मात्र यावरून शिवसेना महिला आघाडीने आक्रमक होत 'आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही' असं म्हटलं होतं. यावरूनच अमृता फडणवीस यांनीही शिवसेनेला सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटले की, "मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार ?" असे म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला.
राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होते. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती. राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तुमच्याकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं सांगितले. यात आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही उडी घेतली आहे. दारुची दुकानं सुरु आहेत, मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रात आहेत का? असा सवाल अमृता फडणवीसांनी उपस्थित केला आहे. “वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते!” असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले होते.