उस्मानाबाद : "धर्म आणि राजकारण यांची गल्लत होऊ नये, असे म्हणणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो ख्रिस्ती धर्मगुरूंनी राजकारणात केलेल्या हस्तक्षेपासंबंधी टिप्पणी का करीत नाहीत?," असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक आणि राजहंस प्रकाशन संस्थेतील ज्येष्ठ संपादक आनंद हर्डीकर यांनी रविवारी केला.
धाराशिव (उस्मानाबाद) येथे होऊ घातलेल्या ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विवेक विचार मंच, धाराशिवच्या माध्यमातून रविवारी सायंकाळी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'दै. मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी राजहंस प्रकाशन संस्थेत कार्यरत असलेले ज्येेष्ठ संपादक आणि साहित्यिक आनंद हर्डीकर यांचे व्याख्यान झाले. हर्डीकर यांनी भाषणातून आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो यांच्या वैचारिक दुटप्पीपणावर ताशेरे ओढले.
"धर्म आणि राजकारण यांची गल्लत होऊ नये, असे म्हणणारे दिब्रिटो ख्रिस्ती धर्मगुरूंनी राजकारणात केलेल्या हस्तक्षेपासंबंधी टिप्पणी का करीत नाहीत?," असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले, "पोप महाशय आंतरराष्ट्रीय राजकारणातही हस्तक्षेप करीत असतात. मग त्याच चर्चमध्ये फादर असलेले दिब्रिटो राजकारण व धर्माविषयीचे त्यांचे मत मांडत नाहीत," याची आठवण हर्डीकरांनी उपस्थितांना करून दिली.
पुढे ते म्हणाले, "चिनी राज्यकर्ते व्हॅटिकनकडून येणार्या पोप महाशयांच्या पत्रांना उत्तरे देत नाहीत. त्यावर फादर दिब्रिटो टीका करताना दिसतात. दिब्रिटोंचा हा दांभिकपणा आहे," अशी खंत आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केली. यावेळी 'दै. मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, "महाराष्ट्रभर वैचारिक माध्यमातून पसरविण्यात आलेला विद्वेष आणि वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी 'विवेक विचार मंच' या चळवळीची सुरुवात झाली. समाजात मूल्य रुजविण्यासाठी साहित्य क्षेत्राची भूमिका असते. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विचारांच्या क्षेत्रात सुरू असलेली बेईमानी थांबविण्यासाठी विवेकाच्या पालखीचे भोई व्हा."