
मुंबई : मुंबईत रविवारी ५ जानेवारी रोजी छात्र भारती विद्यार्थी संघटनेतर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा, नॅशनल रजिस्ट्रर ऑफ सिटीझन आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर विरोधात परिषदेचे आयोजन आलेले आहे. या परिषदेच्या निमित्ताने युवासेनेचे आमदार व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि कथित विद्यार्थी नेता उमर खालिद एकाच मंचावर दिसणार आहेत. परंतु 'आम्हाला या कार्यक्रमाची माहिती नाही आणि युवासेनाप्रमुख तसेच कॅबिनेट मंत्री यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत पुष्टी केलेली नाही. कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक किंवा कार्यक्रम उपस्थितीसाठी आमच्या मध्यवर्ती कार्यालयासोबत समन्वय साधावा', असे ट्विट करत शिवसेनेने छात्र भारतीला आमंत्रणच दिले आहे. यामुळे आता आदित्य ठाकरे या कर्यक्रमाला उपस्थित राहणार कि नाही याबाबतची साशंकता आणखीच वाढीस लागली आहे.
'
५ जानेवारी रोजी मुंबईच्या यशवंत सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार असून, नागरिकत्व कायदा, एनआरसी व एनपीआरबाबत आपली भूमिका या परिषदेत स्पष्ट करणार आहेत.' असे छात्र भरती विद्यार्थी सेनेचे प्रवक्ते सागर भालेराव यांनी सांगितले होते. यानंतर 'भारत तेरे तुकडे तुकडे होंगे' असे वक्तव्य करत देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आलेल्या कथित विद्यार्थी नेता उमर खालिद आणि आदित्य ठाकरे हे एकाच मंचावर दिसणार असल्याने आदित्य ठाकरेंवर टीकेची झोड उठली. त्यानंतर शिवसेनेने आपल्याला या कार्यक्रमाबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक किंवा उपस्थितीसाठी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन ही केले आहे. यानंतर छात्र भारतीच्या कार्यक्रम पत्रिकेवरून आदित्य ठाकरेंचे नाव वगळण्यात आल्याचेही वृत्त आहे मात्र याबाबत अजूनही छात्र भारतीकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.