मुंबई : कुर्ल्यामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली. रात्रीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. एकीकडे राज्य सरकारने नाईट लाइफला मुंबईत परवानगी दिली असता, दुसरीकडे आता महिला सुरक्षिततेचा मुद्दा काल कुर्ला येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणानंतर ऐरणीवर आला आहे. याप्रकरणानंतर विरोधी पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडीला घेरले आहे.
दरम्यान काल रात्री ११ च्या सुमारास कुर्ला (लोकमान्य टिळक टर्मिनस) याठिकाणी चार आरोपीनी एका महिलेला लगूशंकेला गेली असता त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्री ११ वाजेच्या सुमारास कुर्ला एलटीटी मार्गावरून लोकमान्य टिळक टर्मिनसला मध्य प्रदेशची ट्रेन पकडण्यासाठी निघाली होती. एलटीटी मार्गावरून कुर्ला स्टेशन काही अंतरावर असल्यामुळे ती पायी चालत निघाली. वाटेत लघुशंकेसाठी गेली असता नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला.आधी २ नराधमांनी या महिलेवर अत्याचार केले. त्यानंतर आणखी दोन तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनीदेखील पीडितेवर बलात्कार केला. इतकेच नाहीतर आरोपींनी महिलेकडील पैसे आणि मंगळसूत्र चोरून घटनास्थळावरून पळ काढला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर महिलेने १०० नंबरवर फोन करून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करत ४ आरोपींना अटक केली आहे.
आरोपींना अटक
पोलिसांनी सांगितल्यानुसार, चारही आरोपी हे कुर्ला परिसरातच राहणारे आहे. यातील एक जणावर चोरीचे अनेक गुन्हे आहेत. तर एक आरोपी सेल्समन आणि एक रिक्षा चालक असल्याचे सांगण्यात आले आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत महिला सुरक्षेबाबत राज्यसरकारला धारेवर धरले. त्या म्हणतात,"मुंबईत कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रोडवर रेल्वे स्टेशनला जाताना महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे. मुंबईत महिला-मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे असताना मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्यास प्राधान्य देणारे मुख्यमंत्री महिला सुरक्षेला कधी प्राधान्य देणार ?”. भाजप आमदार राज पुरोहित यांनीही नाईट लाईफवरून महिला सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला होता.