नागरिकत्वात अधिकारांसोबत कर्तव्येही येतात: सरन्यायाधीश

18 Jan 2020 20:37:50


justice bobabde_1 &n



नागपूर : 'नागरिकत्व केवळ लोकांच्या अधिकारांपुरते मर्यादित नसून समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांचाही त्यात अंतर्भाव आहे', असे महत्त्वपूर्ण मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०७व्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरन्यायाधीश बोबडे बोलत होते. देशात सध्या नागरिकत्व कायद्यावरून काहूर माजलेले असताना नागरिकत्वाची सरन्यायाधीशांनी केलेली व्याख्या महत्त्वाची मानली जात आहे.



सरन्यायाधीशांनी यावेळी शिक्षणक्षेत्राच्या विदारक स्थितीवरही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले "गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक संस्था प्रचंड व्यावसायिक झाल्या आहेत. शिक्षणाच्या या बाजारीकरणाचा अनुभव मी स्वत: घेतला आहे
”, असे नमूद करत विद्यापीठ ही केवळ दगड, मातीची इमारत नव्हे, तसेच एखादे उत्पादन निर्माण करणारा कारखानादेखील ठरू नये", अशी अपेक्षा सरन्यायाधीश बोबडे यांनी व्यक्त केली.



विद्यार्थ्यांमधील असंतोषाबद्दल चिंता

देशभरातील एकूण स्थिती पाहता विद्यार्थ्यांमध्ये संताप, चीड, असंतोषाचे वातावरण वाढत आहे. त्यांना फसविले जात असल्याची भावना दिसून येत आहे. मुळात शिक्षण ही संकल्पना शिस्त या संकल्पनेशी पूरक अशी आहे. शिस्त नसेल तर शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकाराच्या संतापाची वास्तविक पाहता तीळमात्र गरज नाही, असे म्हणत बोबडे यांनी अप्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांच्या विद्यमान स्थितीवर भाष्य केले. विद्यार्थी केवळ हुशार असून भागत नाही. हुशारीला चारित्र्याची जोड मिळायला हवी. पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्याकडून समाजाला असलेल्या अपेक्षा जाणून घ्यायला हव्यात. केवळ स्वातंत्र्य महत्त्वाचे नसून एकमेकांवर अवलंबून राहात विकास साधणेदेखील जरुरी असल्याचे बोबडे म्हणाले. दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी, परीक्षा नियंत्रक डॉ. राजू हिवसे, विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राधिकरण सदस्य उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0