प्रयागराज : संगमनगरी प्रयाग येथे बुधवारी एक आश्चर्यकारक प्रकरण उघड झाले आहे. सोमवारी सायंकाळपासून एकजण यमुना नदीच्या पुलावर तिरंगा घेऊन उभा होता. ४८ तासांच्या प्रयत्नानंतर त्याला पोलीसांनी सुरक्षित खाली उतरवले. दरम्यान, मी चांद्रयानाशी संपर्क व्हावा, म्हणून प्रार्थना करत, असल्याचा दावा त्याने केला आणि पोलीसही चक्रावले.
रजनिकांत म्हणाला, "विक्रम लॅण्डरशी इस्त्रोचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे चंद्राकडे प्रार्थना करत आहे. त्यासाठी मी वर चढलो." रजनिकांत ४८ तास वर चढून बसला होता. पोलीसांनी त्याला खाली उतरवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. अखेर बुधवारी त्याला एका क्रेनच्या सहाय्याने खाली उतरवण्यात आले.
दरम्यान या प्रकारामुळे पुलाच्या दोन्हीबाजूला मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रजनिकांतला खाली उतरवण्यात आले तेव्हा त्याने जोरदार घोषणाबाजीही केली होती. अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यामुळे त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. रजनिकांत यादव हा येथील भारतगंज येथे राहणारा आहे.
काही दिवसांपूर्वी तो एका वीजेच्या खांबावरही चढला होता. गेल्या वर्षी तो याच पुलावर चढला होता. त्यावेळी त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या गावात गोशाळा बनवावी, अशी मागणी त्याने केली होती. पोलीसांनी त्याला खाली उतरवण्यासाठी त्याच्या कुटूंबियांना बोलावले होते. मात्र, काहीच फायदा झाला नाही. एनडीआरएफचे पथकही त्यावेळी घटनास्थळी पोहोचले होते.