कांदा उत्पादकांना ३१ ऑगस्टपूर्वी दुसर्‍या टप्प्याचे अनुदान

09 Aug 2019 11:01:05




लासलगाव : कांदा उत्पादक शेतकर्‍यांना राज्य सरकारने बुधवारी दिलासा देणारा निर्णय घेतला. कांदा उत्पादक शेतकर्‍यांना ३१ ऑगस्टपूर्वी दुसर्‍या टप्प्याचे अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी ही माहिती दिली.

 

गेल्या वर्षी कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना शासनाने मदत करावी म्हणून निफाडचे आमदार अनिल कदम, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या नेतृत्वाखालील लासलगाव बाजार समितीच्या शिष्टमंडळाने अनुदान देण्याची मागणी सरकारकडे केली होती.

 

या अनुषंगाने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने अनुदान मंजूर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कांदा अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर याआधीच वर्ग झाली होती. मात्र दि. १६ डिसेंबर, २०१८ ते २८ फेब्रुवारी, २०१९ या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमध्ये कांदा हा शेतीमाल विक्री केलेल्या १ लाख, ९१ हजार, ११५ लाभार्थी शेतकर्‍यांची कांदा अनुदान रक्कम रु. १९९.५७ कोटी शासनाकडे प्रलंबित होती. मात्र, दुसर्‍या टप्प्यातील कांदा अनुदानाची रक्कम दि. ३१ ऑगस्टपूर्वी संबंधित लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करावी, असा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला. यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Powered By Sangraha 9.0