पाकव्याप्त काश्मीरही भारतात विलीन करणार !

20 Aug 2019 15:20:38



नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरबाबतचे 'कलम ३७०' रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती थांबता थांबत नाहीत, याबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. कलम ३७० रद्द करणे ही तर सुरुवात आहे. पाकिस्तानशी आता केवळ त्यांनी बेकायदा ताबा मिळवलेल्या काश्मीरबद्दलच बोलायचे आहे, असे मत व्यक्त केले.


ते म्हणाले,
"आता पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र करून त्याच्या भारतातील विलीनीकरणाची वेळ येऊन ठेपली आहे. संसदही त्यासाठी संपूर्णपणे तयार आहे." विद्यमान राजकीय परिस्थितीबद्दल विचारविमर्ष करण्यासाठी जम्मूतील भाजपच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

"आम्ही काश्मीरमधील कलम ३७० रद्द होताना पाहिले. माझी परमेश्वराला प्रार्थना आहे की, याच आयुष्यात पाकव्याप्त काश्मीरही भारतात विलीन झालेला बघायला मिळावा. पाकिस्तानने आमच्या या भागावर बेकायदा पद्धतीने ताबा घेतलेला आहे. भारतीयांनी पाकव्याप्त काश्मीर या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला हवे,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

"पाकव्याप्त काश्मीरची सध्याची राजधानी मुझफ्फराबाद माझ्या डोळ्यासमोर आहे. मुझफ्फराबादमध्ये वाटेल तेव्हा आमचे येणे-जाणे सुरू झालेले आहे. भारताचे हे शहर या संपूर्ण भागासह पूर्ववत भारतात आलेले आहे, असे मी पाहू शकतो आहे," असा आशावादही सिंह यांनी व्यक्त केला.

ओमर, मेहबूबा पाहताहेत हॉलीवूडपट

ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांच्या अटकेवरील काँग्रेस आदी पक्षांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. 'उगीच हा मुद्दा लावून धरला जात असल्याचे सांगत ओमर आणि मेहबूबा दोन्हीही नेते हॉलीवूड चित्रपट पाहत आहेत. पुस्तके वाचत आहेत. ते मजेत आहेत.

Powered By Sangraha 9.0