पाकशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच : राजनाथ सिंह

18 Aug 2019 16:07:54

 

नवी दिल्ली : कलम ३७० रद्द केल्यांनतर बिथरलेल्या पाकिस्तानला उत्तर देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला चांगलेच ठणकावले. आता पाकिस्तानसोबत जी काही चर्चा होईल ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच होणार, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. हरियाणातील कलाकामध्ये आयोजित एका प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.
 
 

राजनाथ सिंह म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात आपल्या शूर जवानांबाबत जे झाले, त्यानंतर पंतप्रधानांनी चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. हवाई दलाच्या आपल्या जवानांनी बालाकोटमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा सफाया करण्यात यशस्वी झाल्याचे तुम्ही पाहिले आहे. बालाकोट एअर स्ट्राइकहूनही मोठा हल्ला भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत्या काळात करू शकतो असा इशाराही सिंह यांनी यावेळी दिला आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला थारा देत राहील तोपर्यंत त्यांच्याशी कोणत्याही मुद्यावर चर्चा केली जाणार नाही आणि चर्चा झालीच तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीर मुद्यावर होईल. काश्मीरविषयी पाकिस्तानने भारताशी चर्चा करावी अशी भूमिका काश्मीरने मांडली होती. तसेच कलम ३७०च्या मुद्द्यावरून पाकिस्तान जगभर मदत मागत आहे. पण कोणीच त्यांना त्यांना मदत करत नाही, अशी माहितीही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली आहे.

Powered By Sangraha 9.0