नवी दिल्ली : २०२२मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये नेमबाजीचा समावेश करणार नसल्याचे राष्ट्रकुल महासंघाने स्पष्ट केले आहे. नेमबाजीच्या जागी महिला टी-२० क्रिकेटचा मात्र समावेश करण्यात आला आहे. बर्मिंगहॅम येथील ही क्रीडा स्पर्धा २७ जुलै ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहे.
राष्ट्रकुल महासंघाच्या अध्यक्षा लुईसी मार्टिन यांनी सांगितले की, "नेमबाजी हा राष्ट्रकुल स्पर्धेचा कधीही कायम खेळ नव्हता. आम्ही त्याबद्दल विचार जरूर केला पण या स्पर्धेत त्याचा समावेश करणे शक्य नाही. आमच्याकडे जागा शिल्लक नाही."
भारताने घेतला होता आक्षेप
२०२२मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी वगळणार असल्याचे वृत्त कळताच भारतीय ऑलिम्पिक संघटनेने यावर निराशा व्यक्त केलेली. त्यानंतर भारताने या स्पर्धेवरच बहिष्कार घालणार असल्याचे सांगितले होते. क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्याकडेही यासंदर्भात पत्र पाठवून बहिष्कारासाठी सरकारची मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.