तेराव्या विधानसभेचा समारोप आणि विरोधकांचे तीन तेरा

06 Jul 2019 21:45:09



महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ येत्या काही काळातच संपेल. नुकताच देवेंद्र फडणवीस सरकारच्या शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनाचा समारोप झाला. पण, या अधिवेशनाएवढे ’सपक’ अधिवेशन गेल्या काही वर्षांमध्ये झाले नाही. या अधिवेशनात जेवढे सत्ताधारी बिनधास्त आणि मोकळेढाकळे वाटले, तसे चित्र याआधी फारसे दिसले नव्हते. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच चार वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेल्या विरोधी पक्षनेत्यांनीच मंत्रिपदाचा मुकुट परिधान केल्याने सुरुवातीपासूनच विरोधकांची अवस्था रया गेलेल्या साम्राज्यासारखी झाली होती आणि त्याचे प्रत्यंतर सभागृहातही दिसत होते. या तेराव्या विधानसभेचा समारोप होत असताना विरोधकांचे मात्र अक्षरशः तीन तेरा होत असतानाचे चित्र पाहायला मिळाले.



महाराष्ट्राच्या
निर्मितीनंतर सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे केवळ दुसरे मुख्यमंत्री ठरले. पाच वर्षांपूर्वी भाजप पक्षश्रेष्ठींकडून राज्याची कमान हातात देण्यात आलेले तरुण मुख्यमंत्री ते आता सत्ताधार्यांपासून विरोधकांवर पूर्ण नियंत्रण मिळवलेले कार्यकुशल, चाणाक्ष मुख्यमंत्री असा फडणवीस यांचा प्रवास राहिला आहे. आज फक्त पक्षात किंवा प्रशासनातच नाही, तर राज्याच्या सर्वपक्षीय राजकीय वर्तुळातसब कुछ फडणवीसअशी परिस्थिती आहे. राज्याच्या स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण, काही प्रमाणात वसंतदादा शरद पवार सोडले तर फडणवीस यांच्याएवढे एकहाती वर्चस्व अन्य कोणत्याही नेत्याचे नव्हते. विधानसभेतील विरोधी बाकांवरील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असो वा राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार किंवा गटनेते जयंत पाटील, हे सर्वजण विद्यमान मुख्यमंत्र्यांसमोर सांभाळूनच बोलतात. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात नेमके चित्र उलट असायचे. एकनाथ खडसे, रामदास कदम नारायण राणे या तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांची त्यावेळच्या काँग्रेसी मुख्यमंत्र्यांना धास्ती असायची. आता मात्र स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात मुख्यमंत्र्यांवर एकही थेट आरोप झाला नाही. त्यामुळे नेमके कुठले मुद्दे काढायचे या विचाराने विरोधक अक्षरशः भांबावून गेल्याचे सध्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेचे चित्र आहे.


काहीच मिळेना म्हणून अक्षरशः २० वर्षांपूर्वीचे प्रकरण काढायची केविलवाणी वेळ यावेळी विरोधकांवर आली. पहिल्या युती सरकारच्या काळातील एक विषय राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी मांडला. त्याचबरोबर पवारांना त्यांच्या अंगणात जाऊननको पुरेकेल्याने यावेळी राष्ट्रवादीच्या निशाण्यावर चंद्रकांतदादा होते. त्यांनाही ओढूनताणून एका जमीन प्रकरणात गोवण्यात आले. पण दुसर्या दिवशी दादांनी सप्रमाण आपल्यावरील आरोप खोडून काढले. सामान्य गिरणी कामगाराच्या घरातील एक सामान्य माणूस तुम्हाला आव्हान देतोय, राज्यकर्ता म्हणून तुमच्यासमोर उभा राहिलाय, हे तुम्हाला पचनी पडत नाही, असा प्रतिहल्लाच दादांनी याकाँग्रेसीसंस्थानिक राजकारण्यांवर केला. त्याचबरोबर अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी तर दादांची खंबीरपणे पाठराखण केली.


गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाने पावसाळी अधिवेशनकाळातच धुमाकूळ घातला. पण, गेल्यावेळी अधिवेशन नागपुरात होते, तर आता मुंबईत झाले. गेल्यावेळी उपराजधानीत विरोधकांनी सरकारला पावसामुळे झालेल्या हाहाकाराचा जाब विचारला होता. त्यावेळी सत्ताधारीही काहीसेबॅकफूटवर गेले होते. आता मात्र यावर्षी झाले उलटेच! पावसामुळे दोन दिवस जवळजवळ मुंबई बंद होती. पण, विरोधकांकडून सरकारला जाब विचारण्याचा कोणताच प्रयत्न झाला नाही. दोन-तीन भाषणे वगळता सभागृहात मुंबईप्रश्नी आवाजच आला नाही. काँग्रेसचे वडेट्टीवार थोरात तर राष्ट्रवादीचे पवार पाटील आपल्यापरीने उसने अवसान आणून विरोधी छावणीमध्ये बळ आणण्याचा प्रयत्न करत होते. सध्याच्या विरोधकांमधीलअभ्यासू नेतेम्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही यावेळी काहीसे शांत होते. नेहमी विधानसभेतबाबाबोलायला लागले की, मुख्यमंत्री आवर्जून ऐकतात. पण, यावेळी बाबांनीही फारशी चुळबुळ केलेली दिसली नाही. अर्धे अधिवेशन पार पडल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडला गेला. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांना तशी संधीसुद्धा कमीच मिळाली. पण, “पुढेही तुम्हालाच विरोधी पक्षनेते राहायचे असल्याने काळजी करू नका. आमच्या नव्या सरकारच्या विरोधात पूर्ण तयारी अजून पाच वर्षे तुम्हाला लढायचे आहे,” असे टोमण्यांवर टोमणे सत्ताधार्यांकडून वडेट्टीवारांवर मारण्यात येत होते.


नाही म्हणायला अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात अंतिम आठवडा प्रस्तावात बोलताना विरोधकांनी विशेषतः राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मंत्री जयकुमार रावल, सुभाष देशमुख, राज्यमंत्री मदन येरावार यांच्यावर काहीबाही आरोप केले. पण, त्यावर या मंत्र्यांनी पाटलांवरच प्रतिहल्ला केला. मुख्यमंत्र्यांवर या मंत्र्यांची बाजू मांडण्याची वेळच आली नाही. त्याआधीच संबंधित मंत्र्यांनी आपल्यावरील आरोप कसे बिनबुडाचे आहेत हे समोर ठेवले. यावरही एरवी विरोधक पुन्हा मत मांडतात, पण यावेळी विरोधकांनी तेवढीहीतोशीशघेतली नाही. यावरूनच त्या आरोपांमधील तथ्यता आपल्या लक्षात येते.


गेल्या अधिवेशनात राज्यपालांच्या झालेल्या अभिभाषणावर या अधिवेशनात चर्चा झाली. त्यावेळी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे अधिवेशन आटोपण्यात आले होते. यावेळी त्या अभिभाषणावर बोलताना विरोधकांनी काहीअंशी सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातही म्हणावी तशीधारनव्हती. माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मात्र यावेळीही आपली दखल घेण्यास सर्वांना भाग पडले. खडसे यांच्या भाषणाकडे आशाळभूत पद्धतीने पाहण्याची वेळ विरोधकांवर आली. खडसेंना सरकारविरोधात उचकविण्याचा प्रयत्नही वारंवार विरोधकांकडून झाला. खडसेंनी मात्रमाझे आणि मुख्यमंत्र्यांचे ठरले आहेअसे सांगून एकच धमाल उडवून दिली. तसेच मी माझ्या स्वपक्षात समाधानी असल्याचेही स्पष्टपणे सांगितले.


अधिवेशनात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही आमदारांची देहबोली तर कमालीची नकारात्मक होती. भाजपमध्ये जायचे, शिवसेनेत घुसायचे की राजकारणापासून दूर व्हायचे या विचारांचा सर्वाधिक खल यावेळी आमदार निवासाच्या चार भिंतींमध्ये झाल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तर एका चर्चेवेळी बोलताना आताआम्हाला अँग्लो- इंडियनची जागा तरी सोडा. ती तरी आम्हाला घेऊ द्या,” असे सत्ताधार्यांना उद्देशून बोलून धमाल उडवून दिली. एरवी गेल्या काही अधिवेशनांमध्ये विरोधी पक्ष शिवसेनेलाही बर्यापैकीटार्गेटकरायचे. यावेळी विरोधकांनी सेनेबाबतही थंड भूमिका घेतल्याचे सभागृहात पाहायला मिळाले. त्यामुळे एरवी अधिवेशन म्हटले की, मंत्र्यांची परीक्षा असते, तर विरोधक जोमात असतात. पण, यावेळी सर्व मंत्री मजेत दिसले. उलट परीक्षा ज्यांनी घ्यायची ते विरोधकच संभ्रमात पडल्याचे मजेशीर चित्र यावेळी पाहायला मिळाले.


विधान परिषदेत काही प्रमाणात नेहमीप्रमाणे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर तुटून पडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यालाही दरवेळसारखीधारनव्हती. धनंजय मुंडे यांच्याबारीकहोण्याची चर्चा जेवढी माध्यमांमध्ये रंगली, तेवढीही चर्चा त्यांच्या भाषणांची किंवा मांडलेल्या मुद्द्यांची झाली नाही. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी दोन दिवस थोडाफार गोंधळ घातला. पण, त्यावेळीही विधान परिषदेचे सभागृह नेते असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांचे सभागृहावरील नियंत्रण सुटले असे चित्र कधी दिसले नाही. विधान परिषदेत यावेळी विरोधकांमध्ये काहीसा विस्कळीतपणाही दिसला. उत्साहाचा अभाव तर होताच. विरोधकांचे नेते धनंजय मुंडे एकाकी खिंड लढवतानाचे चित्र परिषदेत पाहायला मिळाले. मुंडेंनाही यावेळी लोकसभेत गेलेल्या सुनील तटकरेंची आठवण प्रकर्षाने झाली असेल.


वरच्या सभागृहातहीमुंबई-तुंबईझाल्याप्रश्नी फारशी चर्चा झाली नाही. गेला बाजार काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, भाई जगताप यांनी थोडा आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा कुठलाही परिणाम सत्ताधार्यांवर झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना धुंवाधारबॅटिंगकेली. ‘हाताची घडी आणि तोंडावर बोटअशा अवस्थेत बसून ऐकण्यापलीकडे विरोधकांच्या हाती काहीच उरले नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या त्या भाषणावरून त्यांचा कमालीचा उंचावलेला आत्मविश्वास दिसून आला. तसेचमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन, याच ठिकाणी, याच भूमिकेतअसे सांगून मुख्यमंत्र्यांनी आपले इरादे स्पष्ट केले. विधिमंडळाबाहेर मात्र माध्यमांच्या कॅमेरासमोर विरोधकांनी थोडाफारचमकोगिरीकरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यातही त्यांना नेहमीसारखे यश आले नाही. सभागृहातच आरोप झाले नाहीत, तर बाहेर काय आणि कोणत्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडणार, अशी विरोधकांची बाहेरही कोंडी झाली. विरोधकांचे एवढे अवसान गळालेले चित्र गेल्या काही वर्षांत प्रथमच पाहायला मिळाले.


या अधिवेशनाच्या एकूण रागरंगावरूनच आगामी विधानसभा निवडणुकीनंतरचे राजकीय चित्र नेमके कसे असेल, याची आपल्याला स्पष्ट कल्पना येऊ शकते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलोकरा twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0