जीव धोक्यात घालून जवानांकडून अमरनाथ यात्रेकरूंचे रक्षण

04 Jul 2019 16:51:24



नवी दिल्ली : हिंदू धर्मामध्ये महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या अमरनाथच्या यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ झाला. मात्र, हिमालयीन पर्वतरांगांमधील गुहेमध्ये असणाऱ्या अमरनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक अत्यंत खडतर प्रवास करून जातात. त्यामुळे मोजक्याच भाविकांना अमरनाथाचे दर्शन घेता येते. अमरनाथ यात्रा यशस्वी होण्यासाठी भारतीय जवानांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

 
 
 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाकडून (आयटीबीपी) हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. अमरनाथ गुहेपासून काही अंतरावर असणाऱ्या बालताल परिसरातील हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओत पर्वतावरून घरंगळत येणाऱ्या दगडांमुळे अमरनाथ यात्रेकरूंना इजा होऊ नये, यासाठी आयटीबीपीच्या जवानांनी स्वत:ची ढाल केल्याचे दिसत आहे. आयटीबीपीचे जवान जीवावर उदार होऊन त्यांच्याकडील ढालीच्या सहाय्याने हे दगड अडवताना दिसत आहेत.

 
 
 

१ जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाला. येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरु असेल. समुद्रसपाटीपासून ३,८८८ मीटर उंचीवर असलेली अमरनाथची गुहा हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधून ३६ किलोमीटर आणि बलटाल भागातील १४ किलोमीटरच्या मार्गावरून ही यात्रा जाते. या खडतर प्रवासात आयटीबीपीचे जवान यात्रेकरूंना ऑक्सिजन पुरवण्यापासून अनेक ठिकाणी मदत करतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0