लायकी नसलेले लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करतात : विक्रम गोखले

24 Jul 2019 17:46:33


पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले असे व्यक्ती आहेत. ज्यांना हिंदूत्व समजले. मात्र, त्यांचे नाव घेण्याची लायकी नसलेले लोकही त्यांच्यावर टीका करत आहेत, असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी बुधवारी व्यक्त केले. कारगील विजय दिवसाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते.

 

कारगील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन व कारगील विजय दिवसाला २० वर्षे पूर्ण होत असताना 'सरहद' संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याहस्ते उप लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोती धर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यासह विविध पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमही पार पडला. यावेळी 'सरहद'चे संजय नहार, फिशर मेजरमेंट टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक राकेश भान, कारगिल मॅरेथॉनचे संजीव शहा, डॉ. संजय पर्वा यावेळी उपस्थित होते.

 

विक्रम गोखले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनाला 'नायक कि खलनायक', अशी चर्चा होते. सावरकर यांनी मागासवर्गीयांना जवळ करा, असे त्यावेळी म्हटले होते. मुळात असा कार्यक्रम घेणाऱ्यांना त्याची शरम वाटायला हवी. सावरकरांवर टीका करणाऱ्यांवर बोलायला मला वेळ नाही.", असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0