सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत अशा गाजलेल्या नाटकांमधून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भारावून टाकणाऱ्या भरत जाधवने एक संतप्त प्रतिक्रिया देणारा व्हिडीओ नुकताच फसबुकवर टाकला. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील ढिसाळ व्यवस्थापनामुळे भरत जाधवने ही प्रतिक्रिया दिली असल्याचे त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
एखादा नाट्याविष्कार सादर करण्यासाठी प्रत्येक कलाकार खूप मेहेनत घेत असतो. मात्र काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणा बंद असल्यामुळे घामाने चिंब झालेल्या अवस्थेत व्हिडीओ टाकून याने या परिस्थितीचा निषेध नोंदवला आहे. त्याविषयी बोलताना,"प्रयोगासाठी नाट्यगृहे भाडे पूर्ण घेतात परंतु सुविधांच्या नावाने बोंब असते. कधी सुधारणार?" असा प्रश्न त्याने यावेळी उपस्थित केला.
या सगळ्या प्रकारानंतर ठाणे महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी नगर अभियंता, बांधकाम खात्याचे अधिकारी, वातानुकूलित यंत्रणेचे तंत्रज्ञ यांच्यासह तत्काळ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहास भेट दिली आणि तेथील वातानुकूलित यंत्रणेसह अन्य सुविधांची पाहणी केली. भरत जाधव यांना जो त्रास आणि मनस्ताप झाला याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि भविष्यात अशा तक्रारी येणार नाही त्यासाठी योग्य ते आदेश संबंधित अधिकार्यांना दिले आहेत असे
आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat